सोलापूर : ‘गण गण गणात बोते’चा जयजयकार करत श्रीक्षेत्र शेगावहून पंढरपूरकडे निघालेला श्रीसंत गजानन महाराज पालखी सोहळा १५ जुलै रोजी जिल्ह्यात दाखल झाला. या वेळी दिंडीतील वारकऱ्यांच्या शिस्तीचे चित्र नयनरम्य होते.
या पालखी सोहळ्याचे यंदाचे हे ५१वे वर्ष आहे. २५ दिवसांच्या प्रवासानंतर रविवारी या पालखीचे जिल्ह्यात आगमन झाले. गंगेवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याहस्ते श्रीची पूजा करण्यात आली. या वेळी आमदार सिद्धराम म्हेत्रे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमेल कदम, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, माजी उपसभापती अप्पा धनके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीशैल नरोळे, माजी सदस्य सुरेश हसापूरे, कासेगावच्या सरपंच सुरेखा काळे, उपसरपंच शंकर वाडकर, उळे गावच्या सरपंच नीता धनके, उपसरपंच बाळासाहेब धनके आदी मान्यवर उपस्थित होते.

परंपरेनुसार जिल्ह्यातील पहिला मुक्काम कासेगाव हद्दीतील वीजविहीर परिसरात झाला. कासेगाव ग्रामस्थांतर्फे नरसू वाडकर यांच्या हस्ते श्रीची पूजा करण्यात आली. या वेळी संतोष भोजने, बबन खारे, नितीन वाडकर आदी उपस्थित होते. त्यानंतर हरिपाठाचे गायन करीत पालखी सोहळा उळे येथे सायंकाळी साडेसहा वाजता पोहोचला. सरपंच नीता धनके यांच्या हस्ते व श्रीगुरू देहुकर सांप्रदायिक भजनी मंडळातर्फे श्रींची पूजा झाली. या वेळी महादेव शिंदे, भैरू शिंदे, दत्ता शिंदे, गुरूलिंग कुंभार दत्ता महाराज क्षीरसागर, मन्मथ बहिरमल, सचिन शिंदे, गणेश कोले, शशिकांत भुसारे, प्रदीप भूसारे आदी उपस्थित होते.
शेवटची विनवनी ‘संत जनी परिसावी, विसर तो न पडावा, माझा देवा तुम्हाशी’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे भैरवी रागात गायन करत सनई-चैघडा, बॅंड व टाळ मृदंगाच्या गजरात पाऊल खेळणाऱ्या वारकऱ्यांसह मिरवणुकीने पालखी शिवाजी चौकातील तळावर विसावली. जय हनुमान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. रात्री दत्ता महाराज क्षीरसागर यांचे कीर्तन झाले. संस्थानतर्फे संत गजानन महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारीत चित्रफीत दाखविण्यात आली.
उळेकरांचा निरोप घेऊन या पालखी सोहळ्याचे सोमवारी (ता. १६) पहाटे सोलापूरकडे प्रस्थान झाले. या पालखी सोहळ्यासोबत ७४० वारकरी आहेत. यातील २५० पताका धारी २५० टाळकरी व १५० सेवेकरी, दोन रूग्णवाहिका, एक मालट्रक, एक प्रवासी बस, तीन अश्व, पाण्याचा टॅंकर आदींसह नऊ वाहने आहेत. या पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात आगमान झाल्यामुळे भक्तिमय वातावरण तयार झाले आहे.