रत्नागिरी : ‘केवळ रूढ मार्गाने जाण्यात प्रतिष्ठा न मानता स्वतःच्या विकासासाठी आणि आनंदासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडीनुसार, वकुबानुसार करिअरसाठी नवनवीन क्षेत्रे धुंडाळावीत,’ असा सल्ला लोकप्रिय अभिनेते आणि उत्तम व्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी दिला.
रत्नागिरी नगर परिषदेतर्फे गुणगौरव सोहळा आणि करिअर मार्गदर्शन २०१८ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख व्याख्याता म्हणून ते बोलत होते. सोलापूरकर यांनी आपल्या नर्मविनोदी शैलीत अनेक किस्से सांगून विद्यार्थ्यांना करिअरसंबंधी उपयुक्त मार्गदर्शन केले. आयुष्यात मार्गक्रमणा करताना सुसंस्कृत असण्यासोबत नैतिकता जपणेदेखील आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
या वेळी आमदार उदय सामंत, नगराध्यक्ष राहुल पंडित, उपनगराध्यक्ष स्मितल पावसकर, सर्व नगरसेवक, बिपीन बंदरकर, श्री. साळवी, मुख्याधिकारी अरविंद माळी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आयपीएस परीक्षा उत्तीर्ण झालेली रिझवाना ककेरी हिने कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रत्नागिरी नगर परिषद आयोजित या कार्यक्रमात दहावी, बारावी, शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा, उत्तम काम करणाऱ्या शिक्षकांचा आणि आयपीएस परीक्षेत यश मिळणाऱ्या रिझवाना ककेरी यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी बोलताना नगराध्यक्ष पंडित म्हणाले, ‘अडचणी प्रत्येकाला असतात. त्यावर मात करून वा परिस्थितीशी संघर्ष करूनच यश पदरात पडते. त्यामुळे अडचणींनी खचून न जाता विद्यार्थ्यांनी त्यावर मात करायला शिकावे व त्यातूनही आयुष्यभर उपयोगी पडतील असे धडे गिरवावे. आपल्याकडे पदवीधर होणाऱ्या १०० विद्यार्थ्यांपैकी १३ विद्यार्थ्यांना नोकरी मिळते हा ग्रॉस एन्व्हायरमेंटल रेशो आहे. याचा अर्थ उर्वरीत विद्यार्थ्यांना रोजीरोटीसाठी स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःमधील कौशल्य ओळखून त्यानुसार अभ्यासक्रमाची निवड करावी. कौशल्यधारीत अभ्यासक्रमाची निवड केल्यामुळे रोजगार मिळवणे सोपे जाईल.’
‘विद्यार्थ्यांनी नोकरीच्या रूढ पर्यायांकडे न वळता वेगळी वाट चोखाळावी,’ असे आवाहन आमदार सामंत यांनी या वेळी बोलताना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नाईक यांनी केले. नगरसेविका शिल्पा सुर्वे यांनी आभार मानले.