पुणे : ‘सुपरमाईंड शैक्षणिक संस्थेतर्फे मार्च २०१९ च्या दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन प्रश्नसंच विनामूल्य उपलब्ध करून देण्यासह समुपदेशन सप्ताहाचेही आयोजन करण्यात आले आहे’, अशी माहिती संस्थेच्या संचालिका अर्चिता मडके, मंजुषा वैद्य, अश्विनी भालेकर व मेघना मुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘या वर्षीपासून दहावीचा नवीन अभ्यासक्रम, नवीन पाठ्यपुस्तके व प्रश्नापत्रिकांऐवजी कृतिपत्रिका असणार आहेत. सर्व विषयांच्या कृतिपत्रिकांचा समावेश असलेला प्रश्नसंच www.supermindstudy.com या वेबसाईटवरून विद्यार्थ्यांना विनामूल्य डाऊनलोड करून घेता येणार आहे. इंग्रजी, सेमी व मराठी माध्यमाच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश यामध्ये आहे. दहावीच्या बोर्ड परीक्षेला शंभर दिवस राहिले असताना विद्यार्थ्यांना विविध प्रश्नपत्रिकांचा सराव अतिशय उपयुक्त ठरत असतो. त्याकरिता प्रत्येक विद्यार्थ्याला असा संच सहज उपलब्ध करून व्हावा या उद्देशाने संस्थेने ही खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी याचा लाभ करून घेतील’, असा विश्वास सुपरमाइंडच्या संचालिका अर्चिता मडके यांनी व्यक्त केला.
‘चालू वर्षापासून एसएससी महाराष्ट्र बोर्डाने अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकांचा आराखडा बदलला असून, अशा प्रकारच्या बदललेल्या आराखड्याचे हे पहिले वर्ष आहे. त्यामुळे विद्यार्थ्याना मदतीची गरज आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांनी घ्यावा’,असे आवाहनही मडके यांनी केले.
‘या सर्व प्रश्नपत्रिका विविध विषयांच्या तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांनी तयार केलेल्या आहेत. त्यामुळे दर्जेदार प्रश्नपत्रिका घरी बसून सोडविण्याचा सराव विद्यार्थ्यांना उत्तम गुण व गुणवत्ता मिळवून देण्यास नक्कीच उपयुक्त ठरतील. प्रश्नसंच डाऊनलोड करून घेताना काही अडचण आल्यास www.supermindstudy.com वर किंवा ९९२३७९८१७२ या क्रमाकांवर संपर्क साधावा. ९०४९९९२८०७/८/९ या हेल्पलाईन क्रमांकावरही विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन घेता येणार आहे’, असेही या वेळी सांगण्यात आले.
‘दहावीच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक समस्यांबद्दल समुपदेशन करण्यासाठी मोफत समुपदेशन सप्ताहाचेदेखील आयोजन करण्यात आले असून, उत्तरपत्रिका लेखनतंत्र, परीक्षेतील वेळेचे नियोजन, विषयवार अडचणी, छोट्या चुका, ताणाचे व्यवस्थापन, पालकांची भूमिका अशा विविध बाबींवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल. या सप्ताहास इयत्ता नववी, दहावीचे विद्यार्थी व पालक एकत्र येऊ शकतात, त्यांना वैयक्तिक पातळीवर समुपदेशन केले जाईल. प्रशिक्षित शैक्षणिक समुपदेशक मार्गदर्शन करणार असून पालकांनी यासाठी वेळ आरक्षित करून येणे आवश्यक आहे’, असेही या वेळी नमूद करण्यात आले.