‘काऽऽय हो? काय म्हणताय?’ असा परिचित आवाज मला माझ्या नव्या लँडलाइनच्या रिसीव्हरमधून ऐकू आला आणि मला एकदम हुश्श झाले. म्हणजे ते दोघेही पुण्यातल्या त्यांच्या घरीच होते. मी पुण्यातच, गावातून कोथरूडला राहायला आलो होतो. माझ्याकडे नुकताच दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर दूरध्वनी आला होता. आणि चक्क सुरूही झाला होता. मोबाइलचा जमाना इथे सुरू व्हायचा होता अन् लँडलाइनला अजून महत्त्व होते. पहिलाच कॉल कोणाला करायचा, तर तो मी ‘१, रूपाली ७७७, शिवाजीनगर, पुणे’ येथे केला होता. अर्थातच सर्वांचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या ‘पुलं’च्या घरी. त्यांच्या ३३४६२८ या नंबरवर, दिवस होता १४ ऑगस्ट १९९६. पलीकडून सौ. सुनीताबाई देशपांडे बोलत होत्या. त्यांचा नेहमीच बोलताना येणारा ‘काऽऽय हो’चा आवाज मी झोपेतून उठवले तरी त्या वेळीही सहज ओळखू शकलो असतो. मी त्यांना नवीन फोनबद्दल सांगितल्यावर त्या क्षणी त्या म्हणाल्या, ‘थांबा हं.... मी तुमचा नवीन नंबर डायरीत नोंद करून ठेवते.’ त्यांनी लगेच तशी नोंदही केली आणि मगच रिसीव्हर भाईंच्याकडे सोपवला.
मी साधारण १०वीत असल्यापासून आठ नोव्हेंबरला न चुकता ‘पुलं’च्या घरी त्यांना शुभेच्छा द्यायला जात होतो. नंतर शिक्षण संपवून मी औद्योगिक प्रकाशचित्रणाचा व्यवसाय सुरू केला. आवड म्हणून संगीत क्षेत्रातील नामवंतांच्या भावमुद्राही टिपायला सुरुवात केली. माझी ती आवड त्या दोघांच्या नजरेतून सुटती तरच ते नवल. मग मला ते वेगवेगळ्या घरगुती मैफलींची निमंत्रणे आमच्या वाड्यातील श्री. हर्डीकर यांच्या फोनवर देत असत. कधी त्यांचे फोटोचे काही काम असे. मी ते त्वरेने करीत असे. त्यामुळे वेळोवेळी मला त्यांच्या घरी जाण्याची संधी मिळे. कधी माझ्याजवळ कॅमेराही असे; पण बऱ्याच दिवसांच्या परिचयानंतर मला हे उमगले होते, की ‘पुलं’ना फोटो काढून घेण्याचे वावडे नव्हते; पण सुनीताबाई मात्र फोटो काढून घ्यायला विरोध करीत. त्यातून त्या दोघांचा फोटो काढलेला त्यांना अजिबात खपत नसे. याचं कारण त्या सर्वसाक्षीलाच माहीत; पण मी मात्र मनाशी ठरवून टाकलं होतं, की ते दोघे असताना, मग ते त्यांच्या घरी असोत की एखाद्या कार्यक्रमात, मी कॅमेरा बॅगमधून बाहेरच काढत नसे. अगदी ‘पुलं’च्या जन्मदिनाच्या निमित्तानेही मी तसा फोटो कधी काढला नाही; पण प्रत्येक जन्मदिनी येणाऱ्या पाहुण्यांचे अगत्याने स्वागत करणे, त्यांच्या हातावर लगेचच पेढा ठेवणे, कोणी फुले आणली असतील तर तो गुच्छ सोडवून आधी आलेल्या व त्यांनीच सुंदरतेने खोलीत मांडून ठेवलेल्या त्या पुष्परचनांत ती नवी फुले अलगद खोवून ठेवणे, मधेच कोणा महत्त्वाच्या व्यक्तीचा फोन आला, तर तो घेऊन उत्सवमूर्तीला आणून देणे, जमलेल्या गप्पांमध्ये एखाद्या घटनेचा संदर्भ तारीख-वार सांगणे व ही सर्व कामे उत्साही आणि हसतमुख चेहऱ्याने करणाऱ्या व्यक्तीचे नाव होते सुनीता पुरुषोत्तम देशपांडे.
माझं भाग्य असं, की मी पु. ल. आणि सुनीताबाईंच्या स्नेहशील परिवारातलाच झालो होतो. सुनीताबाई जितक्या स्पष्टवक्त्या, व्यवहारी, तेवढ्याच सहृदय, आतिथ्यशील होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे दोन्ही पैलू मी अनुभवले. साधेपणा हा तर एका वेगळ्याच लेखाचा विषय ठरेल. त्याचा एक अनुभव मला आला. दिनांक आठ नोव्हेंबर १९९८. ‘पुलं’ ऐंशीव्या वर्षात पदार्पण करणार होते. लेखकाचा वाढदिवस कसा साजरा व्हावा? त्याच्या नवीन पुस्तकाच्या प्रकाशनाने? हे तर उत्तमच. आणि त्या दिवशी तर ‘पुलं’च्या पुस्तकाबरोबरच सुनीताबाईंच्या पुस्तकाचेही प्रकाशन होणार होते. ‘पुलं’चे ‘आपुलकी’ हे पुस्तक, तर सुनीताबाईंचे ‘सोयरे सकळ’. त्यांच्या मालती-माधव या भांडारकर रोडवरील घराच्या खाली असलेल्या पार्किंगमध्ये हा छोटेखानी समारंभ होता. त्या वेळी पु. ल. व्हीलरचेअरवर होते. दुसऱ्या कोणी व्यक्ती असत्या, तर अशा कार्यक्रमाला उंची असे कपडे आणि झगमगाट नक्कीच दिसला असता; पण इथे तर उत्सवमूर्तींनी अतिशय साधे कपडे घातले होते. ‘पुलं’ साध्या खादीच्या बंडीत आणि पायांवर शाल पांघरलेले, तर सुनीताबाई जांभळ्या रंगांची फुले असलेली सुती साडी नेसलेल्या. डामडौल नसलेला, पण दोन महनीय व्यक्तींचा असा कार्यक्रम.
सुनीताबाईंचे दोघे बंधू व इतर कुटुंबीय, साक्षेपी संपादक श्री. पु. भागवत, मधुभाऊ गानू, शांताबाई शेळके, ज्योत्स्नाबाई भोळे, राम गबाले, भक्ती बर्वे अशा काही मंडळींची आवर्जून उपस्थिती आणि या सगळ्यांचे स्वागत करीत होते रामभाऊ कोल्हटकर. सगळेच एकमेकांना परिचित. त्यामुळे गप्पांचा फड जमणे हे आलेच. काही वेळाने सुनीताबाईंनी सूत्रे हाती घेतली. त्यांनी दोन्ही पुस्तकांची पार्श्वभूमी कथन केली. पुस्तकांचे प्रकाशन अर्थातच ज्येष्ठ प्रकाशक श्री. पु. भागवत यांच्या हस्ते होणार होते.
‘आपुलकी’चे प्रकाशन त्यांनी केले. ते पुस्तक ‘पुलं’नी ज्येष्ठ लेखक श्री. ना. पेंडसे यांना अर्पण केलेले. मग प्रकाशन झाले
‘सोयरे-सकळ’चे. ‘श्रीपुं’नी पुस्तकाचे मुखपृष्ठ जमलेल्या सर्वांना दाखवले. सुनीताबाईंच्या गाजलेल्या ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकानंतरचे हे दुसरे पुस्तक. त्यांनी ‘सोयरे-सकळ’ची ती प्रत सुनीताबाईंच्या हातात दिली. याची अर्पणपत्रिका काय असणार? ‘पुलं’सकट सर्वांनाच उत्सुकता. त्या उत्सुकतेनी ते सुनीताबाईंकडे पाहत होते. सुनीताबाईंनी पहिले पान उघडले आणि ‘पुलं’समोर धरले. त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त ‘सोयरे-सकळ’ हे पुस्तक सुनीताबाईंनी साक्षात ‘पुलं’नाच अर्पण केले होते. ‘पुलं’च्या डोळ्यात आनंदाश्रूंनी गर्दी केली. सगळं वातावरणच भावूक होऊन गेलं. त्या वातावरणात बदल घडवला तो ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी वाचून दाखवलेल्या एका काव्याने. त्यानंतर परत सगळे एकमेकांशी बोलण्यात रंगले. त्या गप्पांच्या आवाजाने पार्किंग भरून गेले.
सुनीताबाईंनी टाळ्या वाजवत परत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. आता त्या काय सांगतात याकडे सगळ्यांचे कान व लक्ष. त्या म्हणाल्या, ‘जी गोष्ट आजपर्यंत कधीही घडलेली नाही, अशी एक कृती मी आज आत्ता करणार आहे. तुम्ही सर्व जण त्याचे साक्षी असणार आहात. मी भाईला नमस्कार करते.’ असे म्हणत त्यांनी पुढच्याच क्षणी ‘पुलं’ना वाकून नमस्कार केला. आयुष्यभर ‘पुलं’शी बरोबरीच्या नात्यानं वागणाऱ्या सुनीताबाईंच्या या कृतीनं सगळेच अचंबित झाले. वातावरणात एकदम शांतता पसरली. या शांततेचा भंग करीत पुढच्याच क्षणी ‘पुलं’नी मला हाक मारली, व म्हणाले, ‘ सतीश, या घटनेचं प्रूफ मला हवंय. हा फोटो मला हवाय.’ त्यांच्या या वाक्याने वातावरणातला तो ताण कुठल्याकुठे नाहीसा झाला. मग सुनीताबाईंनी परत एकदा वाकून ‘पुलं’ना नमस्कार केला अन् तो क्षण मी कॅमेराबद्ध केला. आज त्या आठवणींनीही माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. इतकी मोठी ही माणसं अन् किती साधेपणा.
१२ जून २००० ला पु. ल. अनंताच्या प्रवासाला निघून गेले. काही ना काही कामानिमित्त माझं ‘मालती-माधव’मध्ये जाणं सुरूच राहिलं. भारतीय अभिजात संगीतातील कलावंतांच्या भावमुद्रा असलेल्या माझ्या पहिल्या थीम कॅलेंडरमध्ये मला ‘पुलं’नी माझ्या त्या प्रकाशचित्रांवर लिहिलेला अभिप्राय छापायचा होता. अभिप्राय होता – ‘या अप्रतिम छायाचित्रातून स्वर ऐकू येतात.’ मी सुनीताबाईंना भेटलो. अभिप्राय मराठीत होता. कॅलेंडर इंग्लिशमध्ये. मी मित्राकडून त्याचं भाषांतर करून घेतलेलं. ते वाचल्यावर सुनीताबाई म्हणाल्या, ‘हे भाषांतर फारच गद्य वाटतंय. मला जरा वेळ द्या. मी तुम्हाला याचं रूपांतर करून देते.’ त्यांचा कवितांचा अभ्यास व प्रेम दोन्ही प्रचंड. संध्याकाळी चार वाजता मला त्यांचा फोन आला. म्हणाल्या, ‘हं. घ्या लिहून. These excellent photographs create musical melodies in the minds.’ ते समर्पक आणि काव्यात्मक रूपांतर ऐकून मी आनंदून गेलो. माझ्या त्या ‘म्युझिकॅलेंडर’वर अवतरलेला ‘पुलं’चा तो अभिप्राय आणि त्याबरोबरच त्यांची स्वाक्षरी यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.
सुनीताबाईंचा नेटकेपणा, त्यांची सौंदर्यदृष्टी ही नेहमी अनुभवास येत असेच; पण माझ्या कायमच लक्षात राहील तो त्यांचा कोणत्याही गोष्टीतील अचूकतेचा ध्यास. ‘सोयरे-सकळ’ या पुस्तकानंतर त्यांचे प्रकाशित झालेले पुढचे पुस्तक म्हणजे
‘मण्यांची माळ’. ते प्रकाशित झाल्यानंतर काही दिवसांनी मी ते डेक्कन जिमखान्यावरून विकत घेतले. वेळ संध्याकाळची. तेथूनच मी त्यांना फोन केला. परत एकदा ‘काऽऽय हो? अशी त्यांची विचारणा. मी नुकत्याच घेतलेल्या पुस्तकावर त्यांची स्वाक्षरी हवी आहे असे सांगितले. त्यांनी ‘किती वेळात येऊ शकाल?’ असे विचारले. मी त्यांना म्हणालो, ‘पाचच मिनिटांत पोहोचेन. आत्ता डेक्कनवरच आहे.’ आणि अक्षरशः पाच मिनिटात मी तेथे पोहोचलो. त्यांनी पुस्तकाचे पहिले पान उघडून सही केली ‘सुनीता देशपांडे १५. १०. २००३.’ मग इतर काही बोलणे झाले व मी लगेचच निघालो.
पुढच्याच दिवशी त्या छोटेखानी पुस्तकात मी पूर्ण गढून गेलो. एक तर मला त्यांची लेखनशैली अतिशय आवडे व त्यांनी त्या पुस्तकात निवडलेले बारा लेखही अतिशय सुंदर. त्यातही ‘डोडी’ या त्यांच्या नातवाने पाळलेल्या आणि बराच वेळ त्यांच्याच घरात वास्तव्यास असलेल्या कुत्र्याविषयी लिहिलेला लेख फारच सुंदर. मी ते पुस्तक वाचत असतानाच मला सुनीताबाईंचा फोन आला. त्या म्हणाल्या, ‘काल तुम्ही मण्यांची माळ या माझ्या पुस्तकावर सही घेऊन गेलात ना?’ माझे उत्तर अर्थातच ‘हो’ असे होते. त्या पुढे म्हणाल्या, ‘उद्या तुम्ही ते सही असलेले पुस्तक परत घेऊन या.’ मला काही उलगडाच होईना. पण काय बोलणार? मी त्यांच्या त्या म्हणण्याला होकार दिला. दुसऱ्या दिवशी मी पुस्तक घेऊन त्यांच्या घरी हजर. त्यांच्या हातात मी ते पुस्तक दिले. काहीही न बोलता त्यांनी ते पुस्तक पूर्णपणे पान–अन्–पान निरखून पाहिले. आणि मग माझ्या हातात परत दिले. आताही मला काही उलगडा होईना. मग त्यांनी कारण सांगितले, ‘अहो, आज अजून एक गृहस्थ आले होते सही घ्यायला. त्या पुस्तकातील कागद खराब होता. त्यावर बरेचसे काळे ठिपके होते. संपूर्ण पुस्तकभर ते ठिपके होते. आणि मग काही ठिकाणी अक्षरांवर एखादा ठिपका आला तर तो अनुस्वारासारखा दिसत असल्याने मजकुराचा अर्थच बदलत होता. मग मला तुमच्या पुस्तकावर केलेली सही आठवली. म्हणून मी तुम्हाला फोन केला. मी काही कॉपीही मागवून ठेवल्या आहेत.’ पण सुदैवाने माझ्याकडची कॉपी स्वच्छ कागदाची होती आणि त्यामुळे सुनीताबाईंचे समाधान झाले होते.
अशी जागरूकता असलेले लेखक-लेखिका किती असतील? कोणी घेईल अशी तसदी? पण अशा व्यक्ती थोड्याच असतात आणि त्यांचा तो स्वभावच त्यांच्याबद्दल चुकीचे समज पसरवण्यास कारण ठरत असेल का?
(पूर्वार्ध)
- सतीश पाकणीकर
संपर्क : ९८२३० ३०३२०
(या लेखाचा उत्तरार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)