पुणे : रसिक मित्र मंडळातर्फे मुंबईतील ज्येष्ठ उर्दू पत्रकार शमीम तारिक यांचे मुघल बादशाह बहादूरशहा जफर यांच्या शायरीवर आणि जीवनावर नुकतेच व्याख्यान आयोजित केले होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानाला उर्दू, मराठी काव्य प्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला. मंडळाच्या ‘एक कवी-एक भाषा’ या उपक्रमातील हे ६० वे व्याख्यान होते.
मंडळाचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी यावेळी प्रदीप निफाडकर, मुनव्वर पीरभॉय, रफिक काझी उपस्थित होते.
शमीम तारिक यांनी प्रतिकूल, विपरीत परिस्थितीत जगलेल्या जफर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत अनेक प्रसंग जिवंत केले. जफर यांच्याविषयी माहिती देताना ते म्हणाले, ‘न किसी की आँख का नूर हूँ, न किसी के दिल का करार हूँ, जो किसी के काम न आ सके, मै वो एक मुश्ते-गुबार हूँ अशा वैफल्याच्या ओळी लिहिणारे, मोगल साम्राज्याचा शेवटचे बादशहा ठरलेले बहादूरशहा जफर यांचे जीवन म्हणजे मूर्तिमंत शोकांतिका आहे. इंग्रजांनी बहादूरशहाला ‘पातशाह’ असा किताब देऊन त्याला नामधारी बादशहा बनवले. १८५७ च्या स्वातंत्र्य समरामध्ये बहादूरशहा सामील झाला. क्रांतिकारकांनी इंग्रजांकडून दिल्ली काबीज केली व बहादूरशहास बादशहा म्हणून जाहीर केले. १३३ दिवसांनंतर दिल्ली पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात गेली. दिल्ली ताब्यात घेतल्यानंतर इंग्रजांनी बादशहाला कैदेत टाकले. त्याच्या दोन मुलांची शिरे कापून ती त्याच्या समोर पेश करण्यात आली. त्यावेळी इंग्रजांचा एक हुजर्या बादशहाला म्हणाला, ‘दमदमाये में दम नही अब खैर मानो जान की! ऐ जफर, ठंडी हुई अब तेग हिंदुस्थान की.’ त्यावर उसळून डोळ्याचा अंगार फेकीत बादशहाने दिलेला जवाब पुढील ९० वर्षांचा क्रांतिकारकांचा इतिहास सांगणारा मंत्र ठरला. ‘गाजीयों में बू रहेगी जब तलक ईमान की! तख्ते लंदन तक चलेगी तेग हिंदुस्थान की’ म्हणजे जोपर्यंत धर्मवीरांच्या हृदयात राष्ट्रनिष्टेचा सुगंध दरवळत राहील, तोपर्यंत हिंदुस्थानच्या समशेरीचे पाते लंडनच्या तख्ताचा रोख घेतच राहील. बादशहावर खटला भरून त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. बहादूरशहाला ब्रह्मदेशातील रंगून येथे कैदेत ठेवण्यात आले. तेथील तुरूंगातच ७ नोव्हेंबर १८६२ साली त्यांचे निधन झाले आणि एक जिवंत शोकांतिका संपली.’
जफर यांच्या ‘मेरा रंग रूप बिगड गया’ या प्रसिद्ध ओळींमागचा इतिहास सांगताना ते म्हणाले, ‘इंग्रजानी दिल्लीवर कब्जा केला व बहादूरशहाला पदच्युत करून दिल्ली सोडून जायला सांगितले तेव्हा बहादूरशहाने ही गझल लिहिली. ‘मेरा रंग रूप बिगड गया, मेरा यार मुझसे बिछड गया.’ या गझलेतील ‘मेरा यार’ हा उल्लेख जफर हे लाल किल्ल्याला उद्देशून करतात. आपले राज्य गमावलेल्या, दिल्ली व लालकिल्ला सोडून जायला लागलेल्या पराभूत बादशहाची प्रतिमा डोळ्यासमोर आणली की जफर यांचे जीवन ही मूर्तिमंत शोकांतिका होती, असे वाटून जाते. जफर यांच्या नावे प्रसिद्ध असलेल्या अनेक गझला या आपल्या आहेत, असे दावे केले जातात, तेव्हा जफर यांची शोकांतिका अधिक गहिरी होते.’
‘लालकिला’ चित्रपटात महंमद रफी यांनी ही गझल गायली आहे. कुठलेही तालवाद्य नसताना रफीच्या आवाजाची जादू या गझलेची वेदना बरोब्बर आपल्यापर्यंत पोचवते’, असे या वेळी सांगण्यात आले. दरम्यान, डॉ. मुमताज पीरभॉय यांच्या ‘अंदाज-ए-बयाँ और...’ या पुस्तकाचे प्रकाशन तारिक यांच्या हस्ते करण्यात आले.