नंदुरबार : अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या जिल्हा कमिटीच्या वतीने शहरातील माळीवाडा परिसरात २१ डिसेंबर २०१८पासून राज्यस्तरीय वारकरी संमेलन, तसेच भव्य कीर्तन महोत्सव व ज्ञानेश्वरी पारायणाला उत्साहात सुरुवात करण्यात आली. संमेलनाचे उद्घाटन खासदार डॉ. हीना गावीत यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प प्रकाश महाराज बोधले, भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, उद्योगपती मनोज रघुवंशी, यशोदा जायखेडकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे, नगरसेवक आनंदा माळी, भिला खोरी, ह.भ.प. अनिल महाराज वाळवे, ह.भ.प. किशोर महाराज प्रकाशेकर, ह.भ.प. विजय महाराज जाधव, ह.भ.प. छोटू महाराज, डॉ. तुषार सनसे, कृषीभूषण पाटीलभाऊ माळी, नगरसेवक चारुदत्त कळवणकर, गजेंद्र शिंपी, प्रवीण गुरव, विजय माळी आदी उपस्थित होते.
प्रारंभी माळीवाडा परिसरातून ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी भक्तांनी विविध भक्ती गीते सादर केली. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि ‘जय हरी विठ्ठल’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. या वेळी महिला भाविक भक्तांचा फुगड्यांचा खेळ रंगला होता. या राज्यस्तरीय वारकरी संमेलनाचे संयोजन समस्त माळी समाजाने केले आहे. वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज माळी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फकीरा माळी यांनी केले.