मुंबई : मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी बालेवाडी (ता. हवेली) येथील पाच हेक्टर ६० आर इतकी शासकीय जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे पुणे मेट्रोच्या कामास गती मिळून शहरातील वाहतूकीची समस्या दूर होणार आहे. यासाठी पुणे शहरातील नागरिकांतर्फे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
बापट म्हणाले, ‘पुण्यात आधीच मेट्रोचे दोन ट्रॅक असून, त्यांच्या कामांना वेग आला आहे. हिंजवडी हा औद्योगिक परिसर आहे आणि इथे सुमारे दीड-दोन लाख लोक खासगी वाहनाने येत असतात. इथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो असावी, अशी मागणी होती. मंत्रिमंडळाच्या मंजुरीमुळे मेट्रोच्या कामाला गती मिळाली आहे. पुण्यातील वाहतूक नियोजनासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे. यामुळे पुण्यातील वाहतूक गतिमान होऊन नागरिकांचा वेळ वाचणार आहे.’
‘पुणे महानगर विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची सार्वजनिक-खासगी सहभागाने संकल्पन करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तांतरित करा (DBFOT) या तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात येत आहे. याची बहुतेक कामे पूर्ण व्हायच्या मार्गावर आहेत. पन्नास एकराचा भूखंड शेतकऱ्यांशी चर्चा करून डेपो म्हणून घेण्यात येणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. राज्य शासनातर्फे मिळालेला भूखंड ‘पीएमआरडीए’ विकसित करणार आहे,’ अशी माहिती बापट यांनी या वेळी दिली.