सध्याचं युग डिजिटल क्रांतीचं आहे. त्यामुळे दर वर्षी तंत्रज्ञानाचा खर्च कमी होतो आणि कार्यक्षमता कित्येक पटींनी वाढत चालली आहे. याचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे या प्रकारच्या ‘एक्स्पोनेन्शिअल’ तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी डॉ. भूषण केळकर यांनी ‘इंडस्ट्री 4.0 - नव्या युगाची ओळख’ हे पुस्तक लिहिले आहे. वेगाने बदलणाऱ्या युगात विद्यार्थ्यांना आपलं शिक्षण, करिअर यांबद्दलचे निर्णय घेण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे. या पुस्तकातील एक प्रकरण येथे प्रसिद्ध करत आहोत. .........
गेल्या वर्षीचा दहावीचा निकाल जाहीर झाला, तेव्हा १९३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण असल्याची बातमी होती! जसा १०० टक्के निकाल धक्कादायक आहे, त्यापेक्षाही मला विचार करायला लावणारी गोष्ट होती, ती म्हणजे जी मुलं ६०-७० टक्के गुण मिळविलेली होती, त्यांचं भवितव्य काय? आणि या १०० टक्केवाल्यांचं भवितव्य तरी सुरक्षित आहे का?
‘इंडस्ट्री 4.0’ या युगामध्ये आपण पुढे चाललो आहोत. त्यात जागतिकीकरण, प्रचंड स्पर्धा, जगाच्या एका भागातील बदल दुसऱ्या अत्यंत दूर असणाऱ्या भागावर करत असलेले परिणाम आणि या सगळ्याचाच वेग हे सारं लक्षणीय आणि भयावह आहे.
या पुस्तकातून मला तुम्हा सर्वांसमोर हे चित्र मांडायचंय, की ‘इंडस्ट्री 4.0’ या नव्या युगातले आपण भाग झालेलोच आहोत, त्यामध्ये आपण आपले करिअर नीट विचार करून, जाणीवपूर्वक फुलवायचं कसं याबद्दल! ते आवश्यक का आहे, त्याची दोन उदाहरणं मी तुम्हाला देतो. पहिलं म्हणजे एक आंतरराष्ट्रीय अहवाल असं सांगतो, की आता जी मुलं-मुली पाचवी-दहावीमध्ये आहेत, त्यांनी विचारपूर्वक करिअर आखलं नाही तर ते पदवी/पदव्युत्तर शिक्षणासाठी शाळा/कॉलेज करतील, त्या नोकऱ्यांपैकी ६० टक्के नोकऱ्या नजीकच्या कालौघात नष्ट होणार आहेत.
दुसरं म्हणजे सध्याच्या अहवाल असं सांगतो, की बव्हंशी कंपन्या आणि ५७ टक्के IT कंपन्या असं म्हणत आहेत, की त्यांच्या मनुष्यबळाला री-ट्रेनिंग/री स्किलिंग आवश्यक आहे!! थोड्याथोडक्या नाही, ५७टक्के!!
मार्शल गोल्डस्मिथ याने विख्यात केलेलं एक वाक्य आहे - ‘What got you here, will not take you there!’ मला वाटतं की आता शाळा/कॉलेजमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनीही हे समजणं जरूरी आहे, की आतापर्यंत ज्या गृहीतकांवर आपण यशस्वी झालोय ते यापुढे पुरेसे ठरणार नाहीत. पूर्वी बहुतांश क्षेत्रांत तीन-चार वर्षांची पदवी घेतली, की पुढील ३० वर्षं त्यात नोकरी करणं शक्य होतं. ते आता झपाट्यानं बदलतंय. ‘टू पंच अँड लंच’ म्हणजे कामावर आल्यावरचा ‘पंच’ कामावरून, निघतानाचा ‘पंच’ आणि या दोन्हीमधला ‘लंच’ असा सरधोपट मार्गसुद्धा वेगानं बदलतोय. किंबहुना यापुढील करिअर हे तुम्हाला जो मोबदला देईल, तो ‘वेळेचा आणि माहितीचा’ नसेल, तर ‘कौशल्य आणि उत्पादकतेचा’ असेल.
यापुढे मला वाटतं की करिअर ठरवताना, घडवताना आपल्याला या ‘इंडस्ट्री 4.0’चेच नव्हे तर अनेक बदलते आयाम लक्षात घ्यावे लागतील. तू मोठेपणी ‘कोण होणार?’ यापेक्षा मला वाटतं की तू मोठेपणी ‘कसा होणार’ आणि त्याहीपुढे जाऊन ‘का होणार’ हे प्रश्न अधिक महत्त्वाचे ठरणार आहेत.
करिअरसाठी शाळा किंवा विद्यापीठ यांवर संपूर्णतः अवलंबून राहणं हे माझ्या दृष्टीने आत्मघातक ठरणार आहे आणि म्हणजेच शाळा-कॉलेज-विद्यापीठ हे गणिती भाषेत बोलायचं तर आवश्यक आहे, पण पुरेसे नाही (necessary, but not sufficient)!!
आणि म्हणूनच, जी मुलं-मुली आत्ता आठवीत किंवा त्यापुढील विद्यार्थिदशेत आहेत त्यांनी नेमकं काय करायला हवं, स्वयंअध्ययन-लवचिकता आणि सातत्यपूर्ण बहुआयामी डिजिटल शिक्षण कसं घ्यावं, याची पायाभरणी करण्याबद्दल आपण पुस्तकातून संवाद साधू.
शास्त्र, कला, वाणिज्य, व्यवस्थापन, वैद्यकीय इत्यादी अनेक शाखा-उपशाखा, त्याचबरोबर भारत व जगातील बदल, नोकरी व स्वयंरोजगार या दोन्हींमधील बदलती व्यापारातील व बाजारातील प्रारूपे या सर्वांसाठी आपण आतापासून काय तयारी करायला हवी ते पाहू.
मित्र-मैत्रिणींनो, विद्यार्थी आणि पालकांनो, हे सर्व करणं नुसतं आवश्यक आहे असं नाही, तर ते ‘तत्काळ’ केलं पाहिजे. नाही तर होईल काय, की आपण गृहीत धरतोय की खेळपट्टी संथ आहे आणि आपली तयारी टेस्ट मॅचची चालू आहे; पण जगाची आणि उद्याची अपेक्षा ही ‘जलद खेळपट्टी’ आणि ‘T-20’ ची आहे. बघा परवडेल का तुम्हा-आम्हाला?
(डॉ. भूषण केळकर यांनी लिहिलेले ‘इंडस्ट्री 4.0 - नव्या युगाची ओळख’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)