रत्नागिरी : कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने कृषी, मत्स्य, पर्यटन व वाहतूक या क्षेत्रातील विविध संधी तसेच नवीन व सुरू असणाऱ्या प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री आणि हवाई परिवहन मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरीत एक मे २०१८ रोजी ‘राउंड टेबल कॉन्फरन्स’ आयोजित करण्यात आली आहे.
देशातील एपेडा, एमपेडा, भारतीय कृषी संस्था तसेच केद्रीय पर्यटन बोर्ड, औद्योगिक विकास संस्था, रबर बोर्ड, स्पाइस बोर्ड, काजू निर्यात बोर्ड, आरोग्य प्राधिकरण, लेदर इंडस्ट्रीज, फूड प्रोसेसिंग, जेमस अँड ज्वेलरी इंडस्ट्रीज, टेक्स्टाइल्स इंडस्ट्रीज, नाबार्ड, शिपिंग पोर्ट आणि अनेक राष्ट्रीय बँकेचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित राहणार आहेत.
कोकणाच्या विकासाला चालना द्यायची असेल, तर कोकणातील तरुण नोकरीसाठी कोकण सोडून शहरांमध्ये जाणार नाही, यासाठी इथल्या तरुणांना इथेच कृषी, मत्स्य व पर्यटन क्षेत्रात स्वयंरोजगाराची निर्मिती करण्यासाठी भारतातील केंद्र शासनाच्या व राज्यशासनाच्या अनेक प्रमुख विभागाचे निर्णयक्षम उच्चाधिकारी यांच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे उपक्रम निर्माण करता येतील यांची नियोजनबद्ध आखणी करण्यासाठी प्रभू यांनी या उच्चस्तरीय ‘राउंड टेबल कॉन्फरन्स’चे नियोजन केले आहे
प्रभूंच्या कार्यप्रणालीप्रमाणे प्रथम उत्तम आखणी त्याचप्रमाणे नवीन प्रकल्पांसंदर्भातील नियोजन व सद्य परिस्थितीत सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी ठोस कार्यक्रमाचे नियोजन या पद्धतीने रत्नागिरीतील उच्चस्तरीय ‘राउंड टेबल कॉन्फरन्स’ सत्राच्या माध्यमातून कोकणाच्या विकासाला पुन्हा एकदा वेग मिळणार आहे. कोकणातील कृषी उत्पादनांना निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणावर कोल्ड स्टोरेज तसेच निर्यात केंद्र सुरू करण्याचा प्रभू यांचा मानस आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला तसेच रत्नागिरी शहरातील विमानतळाला प्रभू भेट देणार आहेत. दोन्ही विमानतळ लवकरच सुरू होण्याच्यादृष्टीने ही भेट महत्त्वाची ठरणार आहे.