देवगड : देवगड हापूस आंब्यांना आता स्वत:ची ओळख प्राप्त झाली आहे. बहुप्रतीक्षित असलेले भौगोलिक निर्देशन (जिऑग्राफिकल इंडिकेशन - जीआय) अखेर देवगड हापूस आंब्यांना मिळाले आहे. देवगड हापूसच्या नावावर आता अन्य कोणत्याही प्रकारच्या आंब्यांची विक्री करता येणार नाही. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने गेली पाच वर्षे केलेल्या प्रयत्नांनंतर जीआय मानांकनासाठी गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या सुनावणीमध्ये देवगड हापूसला मान्यता देण्यात आली. त्यामुळे ‘देवगड हापूस’ हा स्वतंत्र ब्रँड निर्माण झाला आहे.
हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळण्यासाठी रत्नागिरी हापूस, दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठामार्फत ‘हापूस’ आणि देवगड तालुका आंबा उत्पादक संघाच्या वतीने ‘देवगड हापूस’ असे तीन अर्ज कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट या राष्ट्रीय संस्थेकडे पाठवण्यात आले होते. ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या भागातील आंब्याला ‘हापूस’ हे मानांकन मिळण्यासाठी दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने अर्ज केला होता.
देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अॅड. अजित गोगटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी देवगड हापूसला जीआय मानांकन मिळवण्यासाठी पाच वर्षे प्रयत्न सुरू ठेवले. देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे मार्केटिंग सल्लागार ओंकार सप्रे यांनी हे मानांकन मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटक, मद्रास व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमधील आंब्याची विक्री केली जात होती. यामुळे देवगड हापूसची एकप्रकारे बदनामी होत होती. देवगड हापूस हा जगप्रसिद्ध आंबा असून, या आंब्याची चव व दर्जा याची देशातील अन्य कोणत्याही आंब्याशी तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे देवगड हापूसला चांगला भाव आहे. याचाच फायदा घेऊन कर्नाटकातील आंबा देवगड हापूसच्या नावाखाली विकून काही विक्रेते ग्राहकांची दिशाभूल करत आहेत.
देवगड हापूसला जीआय मानांकन मिळाल्यामुळे देवगड हापूसच्या नावाखाली केली जाणारी अन्य आंब्यांची विक्री रोखली जाणार आहे. आता देशाबाहेरही हे आंबे ‘देवगड हापूस’ या नावानेच विकले जाणार आहेत.
भौगोलिक निर्देशन म्हणजे काय?
कोणत्याही भौगोलिक स्थानाच्या वैशिष्ट्यामुळे त्या भागात एखादे उल्लेखनीय उत्पादन येत असेल, तर बौद्धिक संपदा हक्कांतर्गत त्याला भौगोलिक निर्देशन दिले जाते. त्यासाठी संबंधित उत्पादनाचे वेगळेपण आणि ते त्या भौगोलिक भागाशी निगडित आहे, ही गोष्ट विविध पुरावे, लागवडपद्धती, तसेच अन्य गोष्टींच्या आधारे सिद्ध करावी लागते. त्यानुसारच हापूस आंबा हे कोकणाचे वैशिष्ट्य असल्याने त्याला जीआय प्राप्त झाले आहे. किनारपट्टीवरील हवा, तसेच जांभ्या दगडाच्या कातळावरील बागांमध्ये तयार होणाऱ्या हापूस आंब्यालाच विशिष्ट चव आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून उत्पादित होणाऱ्या, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उत्पादित होणाऱ्या आंब्यांना स्वतःची अशी वेगवेगळी खास चव असते.