रत्नागिरी म्हणजे रत्नांची नगरी. अनेक नररत्ने या भूमीने देशाला दिली. या भूमीला इतिहासाचा वारसा आहे आणि इथला भूगोल मन रिझवणारा आहे. रत्नागिरी जिल्ह्याला १६७ किलोमीटर लांबीचा शुभ्र, रूपेरी वाळूचा, फेसाळणाऱ्या लाटा अंगावर घेणारा सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. हिरवाईत सामावलेला निसर्ग, लाल मातीतील शिवारे, किल्ले, सागरकिनारे, धबधबे यांसह विविध देवतांची पुरातन मंदिरे, देवस्थाने, स्कूबा डायव्हिंग अशा विविधांगी पर्यटनासाठी पर्यटक रत्नागिरीची निवड करत असतात. रत्नागिरी जिल्ह्यात कुठून कसे येता येते, याची माहिती या लेखात घेऊ या.
पुणे व मुंबईकडून रत्नागिरीत येण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या बसेस आहेत. तसेच खासगी बससेवाही उपलब्ध आहे.
पुण्यातून रत्नागिरीत येण्यासाठी अनेक मार्ग आहेत. मुळशीमार्गे ताम्हिणी घाटातून आल्यास रत्नागिरीच्या उत्तर टोकाकडे म्हणजे मंडणगड, दापोलीमध्ये येता येते. तिथून खेडला येता येते. दापोलीतून सागरी महामार्गानेही रत्नागिरीत येता येते. भोरमार्गे वरंधा घाटातून, तसेच वाई-महाबळेश्वरमार्गे पोलादपूर घाटातून आल्यास खेडमध्ये येता येते. सातारा-पाटण मार्गे कुंभार्ली घाटातून उतरून चिपळूणला येता येते. चिपळूण किंवा खेडला आल्यावर मुंबई-गोवा महामार्गाने रत्नागिरीत येता येते. या मार्गांवरही अनेक पर्यटनस्थळे आहेत. पुण्यातून रत्नागिरीचे अंतर सुमारे ३०० किलोमीटर आहे.
मुंबईवरून मुंबई-गोवा महामार्गाने पनवेल, वडखळ, माणगाव, खेड, परशुराम, चिपळूण, संगमेश्वर, हातखंबा या मार्गाने रत्नागिरीत येता येते. हे अंतर सुमारे ३५० किलोमीटर आहे.
गोव्याकडून यायचे झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, खारेपाटण, तळेरे ही छोटी शहरे ओलांडून रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यात येता येते. तसेच पुढे येऊन लांजा तालुक्यानंतर रत्नागिरी तालुला लागतो. हे अंतर सुमारे २४० किलोमीटर आहे.
कोल्हापूरवरून रत्नागिरी हे अंतर केवळ १३० किलोमीटर असून, या मार्गावरही एसटी बसेसची सेवा उपलब्ध आहे.
कोकण रेल्वे हादेखील रत्नागिरीत येण्यासाठी अत्यंत चांगला पर्याय आहे. पनवेल-रोह्यापासून हा मार्ग कोकणात येतो. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, अंजनी, चिपळूण, कामथे, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर, उक्षी, भोके, रत्नागिरी, निवसर, आडवली, राजापूर रोड ही रेल्वेस्थानके या मार्गावर आहेत. कोकण रेल्वेमार्गाने प्रवास म्हणजे पर्यटनाचा मनमुराद आनंद. आता पुण्याहून सुटणारी एर्नाकुलम गाडीही आठवड्यातून दोनदा कोकण रेल्वेमार्गावरून जाते. त्यामुळे पुणेकरांनाही हा पर्याय उपलब्ध झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला जवळ असलेले विमानतळ म्हणजे मुंबई आणि गोवा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले असून, लवकरच तो वाहतुकीला खुला होणार आहे. तसेच, नजीकच्या भविष्यात ‘उडान’ योजनेअंतर्गत रत्नागिरीतील विमानतळही कार्यान्वित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे हवाईमार्गेही कोकणात येणे सोपे होणार आहे.