आयुष्य नित्यनेमाने जगत असताना अनेक आठवणी मनात खोल जपल्या जातात. तसेच आयुष्यात हवे असते, ते कधी कधी पुढ्यात येऊनही मिळत नाही, असे सांगणाऱ्या, आयुष्याचा प्रत्येक कंगोर उलगडणाऱ्या 'मेनका'तील लेखकांच्या भावस्पर्शी कथा 'पिंपळपाण (भाग २) मध्ये संग्रहित केल्या आहेत.
कमला फडके यांच्या कथेतील तर काश्मीर ट्रीपमध्ये भेटलेल्या अमरशी एकरूप होते, पण यातच तिचा शेवट होतो. अरविंद गोखले यांनी 'नांगी' या कथेत बोहल्यावर चढण्यासाठी आतुर झालेली व लग्न जमण्याच्या क्षणीच माघार घेतलेल्या नायिकेचे चित्रण केले आहे.
शं. ना. नवरे यांच्या 'आम्ही दोघी'त भानूची वाट पाहणाऱ्या यमी व गौरी यांची कथा वाचायला मिळते. त्याचप्रमाणे ग. वा. बेहरे, हमीद दलवाई, गुरुनाथ धुरी, ज्योत्स्ना देवधर, ज्ञानेश्वर नाडकर्णी, नीला वाटवे, चंद्रप्रभा जोगळेकर, सदानंद सामंत, श्रीधर र. दिक्षित. अनंत फाटक आदी लेखकांच्या भावस्पर्शी कथा यात वाचायला मिळतात.