बाळाजी बाजीराव उर्फ थोरले नानासाहेब पेशवे यांचे धाकटे चुलतबंधू व त्यांना कायम साथ दिलेले सदाशिवरावभाऊ उर्फ भाऊसाहेब यांची आठवण फक्त एकाच घटनेवरून येते ती म्हणजे पानिपतची लढाई. हि लढाई 'भाऊं'मुळे मराठे हरले असा समज आजही आहे. पण खरी वस्तुस्थिती काय आहे हे सांगत कौस्तुभ कस्तुरे यांनी 'सकलराजकार्यधुरंदर सदाशिवरावभाऊ' या पुस्तकातून त्यांचे चरित्र वाचकांसमोर आणले आहे.
पराक्रमी, पारदर्शी कारभार, स्वच्छ चारित्र्य, नीडर व सरळ स्वभाव, शौर्य, चिकाटी, बुद्धी, व रणनीतीतील चातुर्य अशा गुणसंपन्न भाऊंशिवाय नानासाहेबांचे पान हलत नसत. लहानपणीच मातृपितृसुखाला हरपलेल्या भाउंचा सांभाळ पेशवे घराण्यातील स्त्रिया व पुरुषांनी केला.
वयाच्या सोळाव्या वर्षांपासून त्यांनी तलवार हाती धरली. भाऊसाहेबांच्या पहिल्या सावनुर मोहिमेपासून ते पानिपतपर्यंतच्या त्यांच्या मोहिमा, त्यांची राजकारणे, मनःस्थिती यावर पुस्तकातून प्रकाश टाकला आहे. अनेक संदर्भ देत सदाशिवरावभाऊंच्या जीवनतील विविध घटनांचा उल्लेख यात केला आहे. मराठेशाहीच्या सुवर्णमयी इतिहासात दडलेले सदाशिवरावभाऊ यांचे विविध पैलू यात उलगडले आहे.