पुणे : ‘महिला दिन खरेतर एक दिवसाचा नसून तो वर्षभर साजरा केला पाहिजे. ज्या माध्यमातून महिला शक्ती व महिलांचा सन्मान सातत्याने घडवून आणणे आवश्यक आहे. ‘गृहिणी’ घरात पूर्णवेळ राबत असते. मुलांचे संगोपन, घरातील व्यवहार, मुलांवर संस्कार अशा सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असते. त्यामुळेच ‘गृहिणी’ असणे हा नोकरीपेक्षाही उच्च सन्मान आहे,’ असे मत गोयल गंगा फाउंडेशनच्या विश्वस्त गीता गोयल यांनी व्यक्त केले.
स्त्रियांच्या कर्तृत्वाला प्रेमाची आणि कौतुकाची थाप मिळणे अत्यंत गरजेचे असते यासाठीच मार्केटयार्ड येथील गंगाधाम टॉवर्स येथे महिलांसाठी नुकतेच स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
‘गोयल गंगा’चे विश्वस्त अतुल गोयल, अमृता गोयल, दीपा अमित कुमार, प्रमुख पाहुण्या इंटिरीयर डिझायनर अमला शेठ आणि लीना सलडान्हा या प्रसंगी उपस्थित होत्या. स्नेहसंमेलनादरम्यान महिलांसाठी नृत्य, गायन असे वेगवेगळे मनोरंजनात्मक कार्यक्रमही घेण्यात आले.
‘आपल्या ध्येयासाठीचे नियोजन हे लहान वयापासूनच महत्त्वाचे आहे. त्यातूनच तुम्हाला भविष्यात काय करायचे आहे याची जाणीव होते. जा महिलांनी स्वतःमधील क्षमतांचा अधिकाधिक विकास साधल्यास त्यांना कोणत्याही क्षेत्रात यश आपोआपच मिळते. आपण काय शिकलो यापेक्षा किती ज्ञान मिळवले याकडे तुमचा कल असू द्या’, असे अमला सेठ यांनी सांगितले. ‘कोणताही व्यक्ती जसा परिपूर्ण नाही तसा कमजोरही नाही, हे लक्षात घेऊन आपण आपल्यातील कमतरता दूर करून परिपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करू शकतो,’ असे मतही त्यांनी या वेळी मांडले.