छत्रपती शिवाजी महाराज व सकवारबाई राणीसाहेब यांचा विवाह नऊ जानेवारी इ. स. १६५६ रोजी राजगडावर जिजाऊसाहेबांनी मोठ्या थाटामाटात लावून दिला. शौर्यशाली घराण्यांचा छत्रपती शिवरायांना स्वराज्याच्या कार्याला पाठिंबा मिळवण्यासाठी जिजाऊसाहेबांनी शिवरायांची आठ लग्ने करून दिली होती.
सकवारबाई राणीसाहेब या छत्रपती शिवाजीराजांच्या सहाव्या पत्नी असून, त्या गायकवाड घराण्यातील होत्या. छत्रपती शिवरायांचे अंगरक्षक कृष्णाजी गायकवाड हे सकवारबाई राणीसाहेबांचे बंधू होत. सकवारबाई राणीसाहेबांच्या पोटी कमळजा नावाच्या एक कन्या होत्या.
कमळजाबाई यांचा विवाह नेताजी पालकर यांचे पुत्र जानोजी पालकर यांच्यासोबत करून देण्यात आला होता. आपल्या हयातीतच प्रतिशिवाजी म्हणून ख्याती पावलेले व परकीयांनी गौरवलेले मराठ्यांचे महान सेनापती म्हणजे नेताजी पालकर.
नेताजी पालकर हे पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील, पण अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर, नदीच्या दक्षिणेस असलेल्या मौजे तांदळी या गावचे. नेताजी पालकर हे वयाने मोठे होते. म्हणूनच छ. शिवराय नेताजी पालकरांना काका या नावाने हाक मारत.
नेताजी पालकरांच्या प्रेमापोटी छ. शिवरायांनी आपली कन्या कमळजा यांचा विवाह नेताजींचे पुत्र जानोजी पालकर यांच्याशी लावून दिला. हा विवाह राजगडावर जिजाऊ व छ. शिवरायांच्या उपस्थितीत पार पडला. विवाहानंतर छ. शिवरायांनी वाई घराण्यातील मौजे पसरणीची मोकासदारी त्यांना बहाल केली.
पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर २६ मार्च १६८९ रोजी रायगडाला झुल्फिकारखानाने वेढा घातला. रायगडाला सुमारे ४० हजार मुघल सैन्य तळ ठोकून होते. रायगडाचा घेर इतका मोठा होता, की ४० हजार सैन्यदेखील वेढा देण्यासाठी अपूर्ण पडत होते. अखेर रायगडचा पाडाव झाला. महाराणी येसूबाईंनी मोगलांशी तह केला. त्या तहानुसार येसूबाई राणीसाहेब यांच्यासह रायगडावरील सर्व जण राजकैदी म्हणून मुघलांच्या कैदेत गेले. त्या वेळी सकवारबाई राणीसाहेब यांना येसूबाई राणीसाहेब, छोटे शाहू यांच्याबरोबर औरंगजेबाच्या छावणीत राजकैदी म्हणून जावे लागले.
स्वराज्याच्या धन्याच्या कुटुंबाला असे काही दुःख भोगावे लागेल याची कल्पनादेखील कोणी करू शकत नव्हते. आपले पुत्र छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्या जाळ्यात अडकले तेव्हा सकवार मातोश्रींना खूप धक्का बसलेला होता. पापी औरंग्याने क्रूरपणे आपल्या लाडक्या शंभूराजांना मारले, की बातमी सकवार मातोश्रींनी ऐकली, तेव्हा त्या फक्त शरीराने जिवंत राहिलेल्या होत्या. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मातोश्रींना औरंगजेबाच्या छावणीत येसूबाई राणीसाहेब व लहानग्या शाहूराजांबरोबर कैदी म्हणून दिवस काढावे लागले होते.
काय अवस्था झाली असेल शिवरायांच्या पत्नीची? औरंगजेबाची छावणी जिथे जाईल तिथे त्यांना जावे लागत होते. जेव्हा औरंगजेबाची छावणी अहमदनगरमध्ये होती. तेव्हा तेथे त्या माउलीने आपले प्राण सोडले. आपल्या शंभूराजांना, शिवरायांना भेटण्यासाठी त्या अनंतात विलीन झाल्या.
दुर्दैव म्हणजे सकवारबाई राणीसाहेबांची समाधी कोठे आहे, हेदेखील इतिहासाला ज्ञात नाही. अशा या पुण्यशील, धीरोदात्त सकवारबाई राणीसाहेब यांना आमचा मानाचा मुजरा.
- डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर
(इतिहास अभ्यासक, पुणे)