पुणे : ‘नियमित व्यायाम आणि सकस आहार घेतला, तर मधुमेहासारख्या आजारावर नियंत्रण ठेवता येते; किंबहुना त्याला दूर ठेवता येते. मधुमेहामुळे शरीरारातील प्रत्येक घटकांवर परिणाम होतो. त्यामुळे मधुमेहाला कशाप्रकारे हाताळावे यासाठी मार्ग व पद्धती शोधायला हव्यात’, असे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परवेज ग्रांट यांनी केले.
जागतिक मधुमेह दिनानिमित्त लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल, रुबी हॉल क्लिनिक व पतित पावन संघटनेतर्फे भव्य मधुमेह-अवयवदान जनजागृती रॅली व मधुमेह तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात डॉ. ग्रांट यांना ‘समाजरत्न’, तर वैद्यकीय सेवा संचालक डॉ. संजय पठारे यांना ‘समाजमित्र’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी लायन्स क्लब्ज इंटरनॅशनलचे प्रांतपाल रमेश शहा, स्मिता शहा, माजी आमदार मोहन जोशी, धारिवाल फाउंडेशनच्या शोभा धारिवाल, माजी प्रांतपाल डॉ. चंद्रहास शेट्टी, उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे, अभय शास्त्री, शाम खंडेलवाल आदी उपस्थित होते.
मधुमेह आणि अवयवदानाविषयी जागृती करण्यासाठी सिटी प्राईड, कोथरूड ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृहापर्यंत रॅली काढण्यात आली. रॅलीचे उद्घाटन महापौर मुक्ता टिळक आणि खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते झाले. नगरसेवक दिलीप वेडे पाटील, प्रदीप धुमाळ यांच्यासह डॉक्टर्स, विद्यार्थी, खेळाडू, मधुमेही रुग्ण, तसेच विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक यात सहभागी झाले होते.
मधुमेहाशी संबधित विविध विषयांवर आयोजित मार्गदर्शन सत्रात इन्शुलीनबाबत समज- गैरसमज या विषयावर मधुमेहतज्ञ डॉ. गौरी दामले, लहान मुलांमधी मधुमेहाची लक्षणे व दक्षता या विषयावर रुबी हॉल क्लिनिकच्या डॉ. मेघना चावला व मधुमेहासाठी आहार याबाबत डॉ. हर्षल एकतपुरे यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. परवेज ग्रांट म्हणाले, 'डॉ. अभय मुथा आणि माझे वडील डॉ. के. बी. ग्रांट खऱ्या अर्थाने या पुरस्काराचे मानकरी आहेत. काही वर्षांपूर्वी माझ्या वडिलांना मिळालेला पुरस्कार या वर्षी मला मिळत आहे, याचा मला विशेष आनंद होत आहे. नियमित व्यायाम आणि योग्य आहाराच्या जोरावर आपण मधुमेहाला दूर ठेवू शकतो. या गोष्टी प्रत्येकाने पाळायला हव्यात.'
शोभा धारिवाल म्हणाल्या, ‘आजवर लायन्स क्लबचे काम चांगले सुरू आहे. यापुढेही सामाजिक व चांगल्या कामासाठी लायन्स क्लबने प्रस्ताव आणावेत. त्यांच्या या सामाजिक कामामध्ये माझा नेहमी सहभाग असेल.’
‘मधुमेह जागृतीसाठी २०१४ पासून हा उपक्रम सुरू आहे. यंदापासून अवयवदान जागृतीही केली जात आहे. यासाठी रुबी हॉल क्लिनिकने नेहमीच पाठिंबा दिला आहे’, असे डॉ. चंद्रहास शेट्टी यांनी सांगितले.
शाम खंडेलवाल यांनी प्रास्ताविक केले. हेमंत नाईक, अनुराधा डोंगरे, नीला कदम यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र गुगळे यांनी आभार मानले.