यवतमाळ : ११ ते १३ जानेवारी २०१९ या कालावधीत यवतमाळ येथे होणाऱ्या ९२व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची कार्यक्रमपत्रिका नुकतीच जाहीर करण्यात आली असून, लेखिका नयनतारा सेहगल यांच्या हस्ते ११ जानेवारीला सायंकाळी चार वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार असून, संमेलनात चर्चासत्र, परिसंवाद, कविकट्टा, कविसंमेलन, प्रकट मुलाखती अशा भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असेल.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, यवतमाळ विदर्भ साहित्य संघ आणि डॉ. वि. भि. कोलते केंद्र व वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ९२व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे यवतमाळमध्ये आयोजन करण्यात आले आहे. ११ जानेवारीला सकाळी साडेनऊ वाजता ध्वजारोहण होईल. त्यानंतर मावळते संमेनलाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येईल. दुपारी चार वाजता लेखिका नयनतारा सेहगल यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात येईल. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, पूर्वाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
साहित्य संमेलन परिसराला शायर भाऊसाहेब पाटणकर परिसर आणि प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठ अशी नावे देण्यात आली आहेत. उद्घाटनानंतर संध्याकाळच्या सत्रात सात वाजता अरुणा ढेरे यांच्या हस्ते कवीकट्ट्याचे उद्घाटन होईल आणि त्यानंतर संध्याकाळी साडे सात वाजता फ. म. शहाजिंदे यांच्या अध्यक्षतेखाली भाऊसाहेब पाटणकर परिसरात कविसंमेलन होईल.
१२ जानेवारीचा दिवस सुरू होईल तो सकाळच्या सत्रातील ‘गदिमायन’ या सांगीतिक कार्यक्रमाने. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग. दि. माडगूळकर यांच्या साहित्यसंपदेचा वेध घेतला जाईल. या कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. वंदना बोकील असून यात अपर्णा केळकर यांचा सहभाग असेल, तर अक्षय वाटवे आणि गौरी देशपांडे हे काव्यवाचन करतील. सकाळच्याच सत्रात सकाळी ११ वाजता भ. मा. परसवाळे आणि विद्या बाळ या मान्यवरांच्या सत्काराचा कार्यक्रम होईल. दुपारी १२ वाजता ‘कृषक समाजाच्या चित्रणाबाबत नागरी लेखक उदासिन का’ या विषयावर डॉ. शरद निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारच्या सत्रात दोन वाजता ‘माध्यमांची स्वायत्तता नेमकी कोणाची’, या विषयावर चर्चासत्र होईल. यामध्ये ज्ञानेश महाराव, जयदेव डोळे, नितीन केळकर आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचा सहभाग असेल. दुपारच्याच सत्रात डॉ. विद्याधर पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात दुपारी १२ वाजता डॉ. विद्यासागर पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘सत्त्वशील समाज घडणीसाठी आज महानुभाव वारकरी आणि बसवेश्वर विचाराची गरज’ या विषयावर परिसंवाद होईल. डॉ. मरतड कुळकर्णी, डॉ. महेश गायकवाड, विजयराज बोधनकर, डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे आणि डॉ. अशोक राणा यांचा यात सहभाग असेल. त्यानंतर दुपारी दोन वाजता ‘ललित गद्य, ललित गद्यकार, ललित गद्यानुभव’ या विषयावर मधुकर धर्मापुरीकर, भारत सासणे, वर्षा गजेंद्रगडकर, डॉ. श्रीकांत तिडके यांचे विचारमंथन होईल. संध्याकाळी पाच वाजता मीरा ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वऱ्हाडी बोली कविसंमेलन होईल.
संध्याकाळच्या सत्रात मराठवाड्याती नामवंत कवी ‘महाराष्ट्राचे काव्यवैभव – चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली’, या काव्यसंमेलनात कविता सादर करतील. १३ जानेवारीला सकाळी साडेनऊ वाजता मान्यवर कवींच्या कवितांचे वाचन होईल. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता ‘साहित्यकेंद्र अभ्यासक्रमामुळे भाषाशिक्षणाची दुरवस्था’ या विषयावर प्रा. प्र. ना. परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. दुपारी १.१५ वाजता चर्चा, बातचीत आणि गप्पा यांचे सत्र रंगेल. यामध्ये डॉ. विजय भटकर, चंद्रकांत कुळकर्णी, डॉ. राणी बंग आणि माधव गाडगीळ या चार प्रतिभावंतांच्या गप्पा ऐकण्याची संधी मिळणार आहे. राजीव खांडेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील. दुपारच्या सत्रात डॉ. प्रभा गणोरकर यांची प्रकट मुलाखत होईल. दुपारी दोन वाजता मंगेश काळे आणि डॉ. कविता मुरुमकर हे मुलाखत घेतील.
या सगळ्या कार्यक्रमांबरोबरच डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता डॉ. रेखा इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली, ‘मराठी समीक्षेची समीक्षा’ या विषयावर परिसंवाद होईल. सकाळी साडेअकरा वाजता ‘नव तंत्रज्ञानाधारित साहित्याच्या नव्या वाटा’ या विषयावर चर्चासत्र होईल. यामध्ये डॉ. जयंत कुळकर्णी, बालाजी सुतार, अतुल कहाते, श्रीकांत बोजेवार, मोहिनी मोडक, डॉ. अजय देशपांडे, क्षितिज पाटुकले हे सहभागी होतील. दुपारी १.४५ वाजता ‘कथा आणि व्यथा – ताडांच्या आणि पोडांच्या’ या विषयावर भाष्य केले जाईल.
नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत समारोप
१३ जानेवारीला सांगता होणाऱ्या संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती असेल. यामध्ये सायंकाळी चार वाजता खुले अधिवेशन होईल आणि त्यानंतर समारोप होईल. संमेलनाध्यक्षा अरुणा ढेरे यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर हे उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी यवतमाळ प्रस्तुत सांस्कृतिक कार्यक्रम होईल.
(अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष 'लक्ष्मीकांत देशमुख' यांची ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने घेतलेली प्रदीर्घ मुलाखत पाहा सोबतच्या व्हिडिओत..)