बालपण रत्नागिरीत गेलेल्या आणि आता पुणेकर असलेल्या शिल्पा कुलकर्णी यांनी त्यांच्या आठवणीतल्या दिवाळीचं केलेलं हे स्मरणरंजन... ...........
दिवाळी हा सगळ्यांचा आवडता सण. मला दिवाळी आठवते ती लहानपणीची. साधारण १९८२ ते १९८५ या काळातली दिवाळी... कोकणातली म्हणजेच रत्नागिरीतली. तेव्हा आताप्रमाणे बारा महिने चिवडा, चकल्या, लाडू, शंकरपाळी होत नसत. तो हक्क फक्त दिवाळीचा होता. एकमेकांच्या घरी फराळाचं करायला मदतीला जायची बायकांची धांदल असायची. आम्हा मुलांना पण त्या हाताखाली घेत. करंज्या, चकल्या दिवस ठरवून केल्या जात. यात कोणीही तुझं-माझं करत नसे. आज तुझ्या घरी, तर उद्या माझ्या घरी. वादविवादाला जागाच नव्हती. आणि खूप आपलेपणानं हे सगळं केलं जाई.
नवे कपडेसुद्धा दिवाळीतच घेतले जात. आता आपण कधीही खरेदी करतो, मनात येईल तेव्हा; पण तरीही अजूनही दिवाळीसाठीचे कपडे आवर्जून घेतोच. कपडे आणि फटाके हे दिवाळीचं मुख्य आकर्षण. फटाक्यांची तर मजाच. ते फटाके कौलावर ठेवून त्याला ऊन द्यायचं. आपटबार, झाड, नागगोळ्या, लक्ष्मी माळ, भुईचक्रं... खूपच मजा यायची.
नरक चतुर्दशीदिवशी अभ्यंगस्नान. पहाटे चार वाजता उठायचंच असा बाबांचा आदेशच असायचा. खरं तर झोपच लागत नसे. कधी एकदा चार वाजतायत आणि उठून पणत्या, आकाशकंदील लावतो, असं होऊन जायचं. हळूहळू सगळी जणं जागी व्हायची. आई सगळ्यांना उटणं लावून आंघोळ घालायची. आणि खास आकर्षण मोती साबणाचं. बरोबर पाच वाजेपर्यंत सगळ्यांचं स्नान आवरायचं. फटाके लावले जायचे. पहिला फटाका कोण लावतो, यावरूनसुद्धा चढाओढ असायची; पण या दिवशीचं आमच्या बाबांचं खास आकर्षण म्हणजे रेडिओवर लागणारं कीर्तन. दर दिवाळीला नरकचतुर्दशी दिवशी तेच कीर्तन असायचं; पण ते न चुकता ऐकायचे आणि आम्हालाही ऐकायला लावायचे. त्यातील एक संवाद मला आजही आठवतो,
‘आणि श्रीकृष्णाने नरकासुराला बाण मारला, सूऽऽऽटणाणाऽऽ’
आम्हाला खूप हसू यायचं; पण हसलं तर बाबा रागावतील म्हणून अगदी चुपचाप बसून असायचो. कधी एकदा ते कीर्तन संपतं आणि बाहेर पळतो असं होऊन जायचं; पण आता मात्र दर दिवाळीला आम्ही भावंडं त्या कीर्तनाची आठवण काढल्याशिवाय राहत नाही.
माझा भाऊ अजूनही दर दिवाळीला बरोबर चार वाजता आम्हा बहिणींना फोन करतो आणि म्हणतो,
‘उठलीस ना?’
‘हो,’ म्हटलं की म्हणतो,
‘तेच बघत होतो. बाबांचे संस्कार विसरली नाहीस ना.’
आधी बाबांच्या धाकाने, आता भावाच्या धाकाने मी अजूनही दर दिवाळीला पहाटे चार वाजता उठतेच; पण आता लोकांचा तो उत्साह, ती धावपळ कमी झाल्याचं दिसून येतं. आता नुसता बडेजाव लायटिंग. पणत्यांच्या रोषणाईतली ती दिवाळीच मला भावते. तेव्हाच्या नवीन कपड्यांचा सुगंध अजून मनात ताजा आहे.
नंतर आवरून देवळात जायचो आणि आल्यावर आईच्या हातचे मस्त दहीपोहे, दूध-गूळ पोहे. लाजवाब! आणि सोबत फराळ. चकल्या, लाडू, कडबोळी, अनारसे. रत्नागिरीत दिवाळीत संध्याकाळी देखावे असायचे. संध्याकाळी रस्त्यावर खूप गर्दी असायची ते देखावे पाहायला.
दर वर्षी दिवाळी आली, की बालपणीची दिवाळी मनात रुंजी घालते. त्या आठवणी मनात साठवत साठवत आताच्या दिवाळीला मन सामोरं जातं.
शुभ दीपावली!! सर्वांना ही दिवाळी आनंदाची, भरभराटीची जावो.
- शिल्पा पराग कुलकर्णी, कोथरूड, पुणे
मोबाइल : ८०८७२ ६७२६५
ई-मेल : shilpasabniskulkarni@gmail.com
(‘आठवणीतली दिवाळी’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)