पुणे : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी लोकसहभागातून शंभर नवी घरे बांधण्याचा संकल्प मूळचे कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट या गावचे आणि आता पुण्यात स्थायिक असणारे कुलभूषण बिरनाळे आणि अन्य समविचारी व्यक्तींनी केला आहे.
या प्रकल्पाची सविस्तर संकल्पना, आराखडा, नियोजित कार्यपद्धती आणि पुढील कार्यवाही यावरील चर्चेसाठी शनिवारी, २३ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजमधील ज्ञानेश्वर सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. ‘या बैठकीला सर्व इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहून हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य करावे,’ असे आवाहन कुलभूषण बिरनाळे यांनी केले आहे.
पूरग्रस्तांच्या घरांच्या पुनर्बांधणीचे मोठे आव्हान लोकांसमोर आणि प्रशासकीय यंत्रणेसमोर आहे. या कामात आपलाही सहभाग असावा म्हणून बिरनाळे यांनी समाजमाध्यमाद्वारे ही संकल्पना मांडली. सर्व स्तरातून त्यांना उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांच्यासमवेत पूर्वी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून आणि सांगली जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून अनेक वर्षे काम केलेले लक्ष्मीकांत देशमुख, प्रसिद्ध वास्तुरचनाकार शिरीष बेरी, टाटा ग्रुपचे माजी व्यवस्थापक दीपक गोखले यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्ती, तसेच आयएएस अधिकारी संघटना, इन्फोसिस, स्ट्रॅटेजिक फोरसाइट, महाराष्ट्र चेंबर आदी अनेक संस्थांनीही या उपक्रमात सहभाग घेण्याची तयारी दर्शविली आहे.
कुलभूषण बिरनाळे गेल्या दहा वर्षांपासून अब्दुललाट येथे अनाथ, वंचित मुलांसाठी बालोद्यान ही संस्था चालवत आहेत. ‘बालोद्यान संस्थेच्या पुढाकारातून नव्या घरांच्या उभारणीचा प्रकल्प राबविला जाणार असून, प्रकल्पाचा आराखडा प्रसिद्ध वास्तुरचनाकार शिरीष बेरी आणि दीपक गोखले तयार करत आहेत. लक्ष्मीकांत देशमुख यांचा या भागातील प्रशासकीय अनुभव या प्रकल्पात महत्त्वाचा ठरणार आहे,’ असेही बिरनाळे म्हणाले.
(‘बालोद्यान’च्या कार्याची ओळख करून देणारा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)