मुंबई : ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा बूथ कसा मजबूत होईल, ताकदवान होईल यावर प्रचंड मेहनत घ्या,’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांसाठी वक्ता प्रशिक्षण शिबिर २३ जुलैला प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात आपण जिथे निवडणूक लढवू तिथे बुथ कमिटीची सभा होईल असे सांगतानाच लवकरच पाटणला पहिली सभा होईल, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली. बुथ कार्यकर्त्यांची मते प्रदेशाध्यक्षांनी जाणून घेतली.
या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर, वक्ता सेलचे अध्यक्ष प्रदीप सोळुंके, आयटी सेलचे अध्यक्ष सारंग पाटील, निरंजन टकले, सुधीर भोंगळे उपस्थित होते.
आमदार टकले म्हणाले, ‘पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवा, राज्यसरकार ही केंद्रसरकारची झेरॉक्स कॉपी असुन केंद्रसरकार आपल्या पापांना पाठिशी घालते आहे तसेच राज्य सरकारही भ्रष्टाचारी आणि इतर चुकीच्या गोष्टींना पाठिशी घालतात. बुथ कार्यकर्त्यांची संवादाची भूमिका असायला हवी. सरकारचे चुकीचे धोरण जनतेला समजावून सांगा. पाच वर्षांत यांनी काही केले नाही; पण निवडणूका जिंकल्या. या निवडणुकीत साम दाम दंड भेद हे अस्त्र वापरून यांनी निवडणूका जिंकल्या. त्यामुळे सर्वांची अवस्था वाईट होईल त्याआधीच आपण कंबर कसली पाहिजे, ही परिस्थिती लोकांसमोर मांडा.’