रत्नागिरी : जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देण्याची हेतूने रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे ३० जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० ते सायंकाळी चार या वेळेत पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार आहे. पर्यटन क्षमता, आव्हाने, संधी, विकास व नियोजन या दिशेने योग्य आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे.
या परिषदेला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पर्यटन क्षेत्रातील मान्यवर, तज्ञ उपस्थित राहणार आहेत. ही परिषद तीन सत्रांत होणार असून, सकाळी १० ते दुपारी दोन या पहिल्या सत्रामध्ये साहसी, निसर्ग, सांस्कृतिक, ऐतिहासिक व प्लास्टिक, कचरामुक्त पर्यटनावर वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण केले जाणार आहे. साहसी पर्यटन सुहास ठाकुरदेसाई, निसर्ग पर्यटन नीलेश बापट, क्रोकोडाइल, नदी सफारी धीरज वाटेकर, ऐतिहासिक, सांस्कृतिक पर्यटन सुधीर रिसबूड, कृषी पर्यटन सचिन कारेकर, आरोग्य पर्यटन डॉ. अभय धुळप, थीम पार्क व पर्यटनावर वैभव सरदेसाई हे प्रकल्प सादर करतील.
दुसर्या सत्रामध्ये दुपारी १२ ते दोन या वेळेत शाश्वत पर्यटन क्षमता व आव्हाने यावर चर्चासत्र होईल. यामध्ये हॉटेल्स असोसिएशन, टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट, सामाजिक व पर्यटन संस्था, लोकप्रतिनिधी, पर्यटन प्रतिनिधी, शिक्षण संस्था, शासन प्रतिनिधी, अभ्यासक सहभागी होणार आहेत. तिसर्या सत्रात शाश्वत पर्यटन संधी, विकास व नियोजन यावर शासनाच्या विविध विभागातील प्रतिनिधी, मान्यवरांचे भाषण होणार आहे.
‘मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, सागरी महामार्ग, नवे पूल, रेल्वेचे दुपदरीकरण, जहाज वाहतूक, लवकरच होणारी प्रवासी विमान वाहतूक यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. समुद्रकिनार्यांचा विकासही केला जात आहे; मात्र पर्यटक गोव्याऐवजी रत्नागिरीत राहिला पाहिजे. यातून जिल्ह्याचा विकास होऊ शकतो आणि तरुणांना रोजगारही मिळू शकतो, यासाठी ही परिषद आयोजित केली आहे,’ असे संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी सांगितले.