पालघर : जिल्ह्याचा तृतीय वर्धापनदिन जिल्हा परिषदेमार्फत उत्साहत साजरा करण्यात आला. या वेळी ‘आनंदी ऑगस्ट’अंतर्गत विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.
जिल्हाभरात दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी स्वच्छता प्रभात फेरी काढून हा दिवस साजरा केला. या वेळी शिक्षकांनी स्वच्छतेचे महत्त्व या विषयावर जनजागृती केली. स्काउट आणि गाइड्सच्या साह्याने हा उपक्रम यशस्वी झाला. ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत शौचालय बांधण्यावर न थांबता त्यापुढे जाऊन मुलांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण करण्यासाठी आणि या विषावर जनजागृती करण्यासाठी सर्व शाळांमध्ये स्वच्छतेबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
स्तनपान सप्ताह साजरा करून अंगणवाडी केंद्रात स्तनदा मातांना स्तनपानाचे महत्व विशद करण्यात आले. बाळाच्या पहिल्या दोन वर्षांत आईचे दूध अत्यंत महत्त्वाचे असून, त्यामुळे बाळाचे आरोग्य सुधारण्यासाठी व कुपोषणावर मात करण्यासाठी स्तनपान करणे गरजेचे आहे, असे सांगण्यात आले.
जिल्हा परिषद शाळांमध्ये चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात असून, उत्कृष्ट चित्रकलेला बक्षीस दिले जाणार आहे. तृतीय वर्धापनदिनानिमित जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आयोजित समारंभात स्वच्छ भारत अभियान, कृषी विभाग, समाज कल्याण विभाग आदी महत्त्वपूर्ण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
पेसा गाव घोषित झालेल्या ग्रामपंचायती आणि त्या गावातील लोकप्रतिनिधींना अधिसूचनेची प्रत प्रदान करण्यात आली; तसेच सेवानिवृत्त अधिकारी-कार्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हटले. आरोग्य विभागामार्फत रक्तदान शिबिर घेण्यात आले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रक्तदान केले.