पुणे : पूरग्रस्त कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पुनर्वसनाच्या कामात मदत करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे आणि विद्यार्थी विकास मंडळाचे विद्यार्थी पुढे सरसावले असून, गुरुवारी (२२ ऑगस्ट) ५०० विद्यार्थ्यांचे पथक या भागात रवाना झाले. या पथकाच्या गाड्यांना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
या वेळी ‘एनएसएस’चे विद्यार्थी समाज उभारणीचे काम करत असल्याचे गौरवोद्गार विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी काढले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, प्रसुनजीत फडणवीस, प्राचार्य संजय चाकणे, प्राचार्य सुधाकर जाधवर, बागेश्री मंठाळकर, विद्यार्थी विकास मंडळाचे सदस्य डॉ. सदानंद भोसले या वेळी उपस्थित होते.
डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, ‘नैसर्गिक आपत्तीची दाहकता मोठी आहे. या पूरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या स्थितीत त्या ठिकाणच्या लोकांना मदत करणे हे आपले सर्वांचे कर्तव्यच आहे. या कामाच्या निमित्ताने त्या भागात जाणाऱ्या ‘एनएसएस’च्या विद्यार्थ्यांचे आणि तेथील स्थानिकांचे आयुष्यभराचे ऋणानुबंध जुळणार आहेत. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भानही निर्माण होईल.’
कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर म्हणाले, ‘नैसर्गिक आपत्तीमुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. शासनाच्या आणि स्वयंसेवी संस्थांसह इतरांकडून पैसे आणि वस्तूरुपाने मदतीचा ओघ बाधित क्षेत्राकडे जात आहे; मात्र त्यांना हाताच्या रुपाने मदतीची आवश्यकता आहे. ती गरज ‘एनएसएस’चे विद्यार्थी भागवतील. त्या ठिकाणी स्वच्छतेसह इतर कामे विद्यार्थी करणार आहेत. ही प्रक्रीया पुढचे सहा महिने चालणार असून, विद्यार्थ्यांची विविध पथके मदतीसाठी जाणार आहेत. या निमित्ताने बाधित क्षेत्रातील लोकांच्या मनाला उभारणी मिळणार असून, त्यांना आपत्ती व्यवस्थापनेचे धडेही मिळतील.’
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संजय चाकणे यांनी केले. सूत्रसंचालन स्वामीराज भिसे यांनी केले, तर आभार डॉ. सदानंद भोसले यांनी मानले.