सोलापूर : ‘मनुष्य मृत्यूनंतर स्वर्गात जातो, असे म्हटले जाते. याची शाश्वती नाही; परंतु साहित्यिकांचे अस्तित्त्व मात्र पुस्तकरूपाने उरते,’ असे प्रतिपादन ईस्लामपूर येथील गवळी प्रकाशनचे प्रकाशक राजेंद्र गवळी यांनी केले.
येथील शिवस्मारक सभागृहात ६ ऑगस्टला गवळी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या सोलापूरच्या पाच लेखकांच्या आठ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी सोलापूर येथील साहित्य-परंपरेचा गौरव करून सोलापुरातील साहित्यिकांची जास्तीत जास्त पुस्तके प्रकाशित करण्याचा संकल्प त्यांनी या वेळी व्यक्त केला.
ज्येष्ठ साहित्यिक व मनोरमा साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन झाले. ‘भावना व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे साहित्य होय. समाजातील संस्कृती व मानवता टिकवण्याचे महत्त्वाचे कार्य साहित्य करते,’ असे त्यांनी या वेळी नमूद केले.
प्रमुख वक्त्या डॉ. श्रुती वडगबाळकर म्हणाल्या, ‘आजची युवा पिढी साहित्यापासून दूर जात आहे. संगणक, मोबाईलमध्ये व्यस्त झाली आहे. त्यांच्याकडे जगण्यासाठी ठोस भूमिका नसल्याने नैराश्याने ग्रासल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. संयम व सहनशीलता हे फक्त साहित्यच शिकवते.’
यावेळी योगिराज वाघमारे यांच्या ‘घुसमट’ व ‘गहिवर’ या कादंबऱ्यांचे, अवधूत म्हमाने यांच्या ‘मुलांच्या आवडत्या गोष्टी’ या बालकथासंग्रहाचे, राजेंद्र भोसले यांच्या ‘राजेंद्र भोसले यांच्या निवडक कथा’ व ‘विळखा’ कथासंग्रहांच्या चौथ्या आवृत्तीचे, प्रमोद लांडगे यांच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या वैचारिक ग्रंथाचे, नागनाथ गायकवाड यांच्या ‘हिरवळीचा कोपरा’ काव्यसंग्रहाचे व ‘टोपीवर टोपी व इतर एकांकिका’ यांचे प्रकाशन झाले.
या वेळी सर्व लेखकांनी मनोगत व्यक्त केले. योगिराज वाघमारे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन कवी माधव पवार यांनी केले. या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली, ल. सि. जाधव, सुरेखा शहा, गोविंद काळे, शोभा मोरे, डॉ. शिवाजीराव देशमुख, डॉ. सुहास पुजारी, पद्माकर कुलकर्णी, डॉ. सारीपुत्र तुपेरे, डॉ. संघप्रकाश दुड्डे, निर्मला मठपती, वंदना कुलकर्णी, विद्या कुलकर्णी, बदीउज्जमा बिराजदार यांच्यासह साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.