अमरावती : ‘नक्षलवादांच्या प्रश्नांचा आपण फार विचार करत आहोत; परंतु नक्षलवादाने लक्ष वेधलेल्या प्रश्नांकडे आपण दुर्लक्ष करतो. ते प्रश्न म्हणजे भूक, बेकारी, दारिद्र्य, नोकरशाहीचा जुलूम हे होय. नक्षलवाद हे भारतीय अव्यवस्थेचे देणे आहे. त्यांचा बिमोड करायचा असेल, तर भारतीय राज्यघटनेतील मुल्यांचा आधार घ्यावा लागेल व सामाजिक, आर्थिक लोकशाही निर्माण करावी लागेल,’ असे प्रतिपादन साहित्यिक आणि महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोष मंडळाचे सदस्य डॉ. राजशेखर सोलापुरे यांनी केले.
प्रा. डॉ. प्रशांत विघे लिखित ‘नक्षलवादी चळवळीचा विकास आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी’ तसेच ‘भारतीय संविधानातील तरतुदी आणि स्थानिक स्वशासन’ या दोन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम भारतीय महाविद्यालयाच्या सभागृहात झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारतीय विद्यामंदिरचे अध्यक्ष डॉ. रमेश बिजवे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय विद्यामंदिरचे सरचिटणीस डॉ. सतीश कुळकर्णी, प्राचार्य डॉ. धर्मेंद्र तेलगोटे, अनंत सोमवंती, साईनाथ प्रकाशनच्या संचालिका ललिता पुराणिक उपस्थित होत्या.
डॉ. सोलापुरे पुढे म्हणाले, ‘प्रतिक्रियावादी स्वरूपात विकसित झालेला नक्षलवाद सामुहिक हिंसेचे समर्थन करतो. अहिंसावादी बुद्धांच्या देशात हिंसाचाराचा उद्रेक घडविला जत आहे; परंतु हिंसा आणि अराजकता हे अन्यायाने परीमार्जीत करण्याचे साधन होऊ शकत नाही. लोकशाही ही अधिकाधिक लोकशाहीत येऊन मिळावी लागते. यावर विचार झाला पाहिजे, तरच नक्षलवादाचा विकास रोखता येईल, अशी मांडणी करणाऱ्या दोन ग्रंथांचे लेखन डॉ. प्रशांत विघे यांनी केले आहे. ज्यामुळे नक्षलवादाकडे व भारतीय राज्यघटनेकडे नव्या दृष्टीने पाहणे शक्य झाले आहे.’
‘डॉ. विघे यांचे भारतीय राज्यघटनेचे पुस्तक हे भारतीय राज्यघटनेची मूल्य रुजविण्यात यशस्वी होणार आहे. राज्यघटनेचा समकाळातील अभ्यास अधिक प्रभावीपणे करणे अत्यावश्यक आहे,’ असे मत डॉ. तेलगोटे यांनी मांडले.
डॉ. सतीश कुलकर्णी यांनी डॉ. विघे यांनी संक्षिप्त स्वरूपात दोन मोठे विषय अभ्यासल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. त्यांच्या पुस्तक निर्मितीचे विश्लेषण करताना आपल्या लेखन प्रवासाला उजाळा दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक साईनाथ प्रकाशनच्या प्रकाशक ललिता पुराणिक यांनी केले. प्रा. स्वाती चौधरी यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. संतोष बनसोड यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. राजेंद्र उमेकर, डॉ. ज्ञानेश्वर यावले, डॉ. दीपक राऊत, डॉ. आशिष काळे, डॉ. गोविंद तिरमनवर, डॉ. वामन गवई, प्रा. मनीष चोपडे, डॉ. अनिल वानखेडे, डॉ. नितीन चांगोले, दिनेश जामनिक, प्रा. राहुल रडके, डॉ. आकाश मोरे, डॉ. अतुल वानखेडे, मयूर देवहाते, प्रा. प्रशांत ठाकरे आदींनी मेहनत घेतली.