रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दलाच्या येथील मुख्य प्रशासकीय इमारतीचे अनावरण तटरक्षक दलाचे प्रमुख महानिदेशक राजेंद्र सिंग यांच्या हस्ते १५ नोव्हेंबर २०१८ रोजी करण्यात आले. या बरोबरच तटरक्षक दलाचे कार्यालय विमानतळ येथून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मिरजोळे ब्लॉक एच-टू या भूखंडावर स्थलांतरित झाले आहे.
या वेळी महानिदेशक सिंग यांच्या पत्नी व तटरक्षिका संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा उर्मिला सिंह, तटरक्षक पश्चिम क्षेत्राचे कमांडर महानिरीक्षक विजय चाफेकर, तटरक्षक जिल्हा मुख्यालय महाराष्ट्रचे कमांडर उप महानिरीक्षक मुकुल गर्ग उपस्थित होते.
अनावरणानंतर सिंग यांनी येथील तटरक्षक दलाचे कमांडर कमांडंट एस. आर. पाटील यांच्याकडून रत्नागिरीतील तटरक्षक दलाच्या विकासकामांबद्दल विस्तृत आढावा घेतला. रत्नागिरी कार्यालयाने हाती घेतलेल्या सागरी सुरक्षा उपाययोजना, सागरी शोध व बचाव मोहिमा, समुदाय संवाद कार्यक्रम, प्रशिक्षण उपक्रम, रहिवाशी सदनिका, भगवती बंदर येथे प्रस्तावित जहाज दुरुस्ती केंद्र व जेट्टी, भाट्ये येथे प्रस्तावित होवरपोर्ट, मिरजोळे येथील एच-वन भूखंडात प्रस्तावित विमान हँगर, धावपट्टी विस्तारीकरण-आधुनिकीकरण-विद्युतीकरण आदी सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्माण केल्या जाणाऱ्या पायाभूत विकास कामांबद्दल कमांडंट पाटील यांनी महानिदेशक सिंग यांना सविस्तर माहिती दिली. त्यानंतर रत्नवाटिका या ग्रीन हाउस उद्यानाचे अनावरण करण्यात आले.
सिंग यांनी येथील तटरक्षक दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे नवीन वास्तूत स्तलांतरण केल्याबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. चालू पायाभूत सुविधांच्या विकास कामांबद्दल समाधान व्यक्त करत लवकरच रत्नागिरी विमानतळ येथे नवे तटरक्षक वायु दलही कार्यान्वित केले जाणार असल्याची माहिती सिंग यांनी दिली. रत्नागिरी हे देशातील तटरक्षक दलाचे महत्त्वाचे बेस बनविण्याच्या दृष्टीने अद्ययावत विमानतळ, होवरपोर्ट, मोठ्या जहाजांसाठी जेट्टी, जहाज दुरूस्ती केंद्र, तांत्रिक पायाभूत सुविधा आदींसाठी मुख्यालय कार्यरत असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. रत्नागिरी व कोकणातून अनेक व्यक्ती भारतरत्न असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
तटरक्षक दलाचा विकासाबाबत बोलताना महानिदेशक म्हणाले, ‘तटरक्षक दल प्रगतीची नव नवीन शिखरे पार करीत आहे. सध्या तटरक्षक दलाकडे १४१ जहाजे, ६२ विमाने असून, आणखी ७२ नवी जहाजे आणि १६ विमाने बनत आहेत; तसेच १४ हेवी हेलिकॉप्टर तटरक्षक दल घेणार आहे. मागील वर्षभरात तटरक्षक दलातर्फे जवळजवळ ३७ हजार समुद्री छापे, १८ हजार तास विमान गस्त कार्यवाही, आणि १६ हजार दिवस समुद्र गस्ती कार्यवाही कुशतेने पार पाडल्या. यांमध्ये शोध व बचाव कार्यांत ७२३ जणांचे प्राण वाचविण्यात आले. आपत्कालीन वैद्यकीय निर्वासन करताना ३९ लोकांचा बचाव, स्थानिक प्रशासनास मदत करताना तीन हजार ५९८ लोकांना मदत, याव्यतिरिक्त केरळमधील पुराच्यावेळी तीन हजार ५२१ लोकांना, तर दिग्लिपूर येथील सीमित बेटावरील आपत्कालात ७७ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.’
‘अवैधरित्या भारतीय समुद्र क्षेत्रात भारत-पाकिस्तान समुद्र सीमेतून घुसखोरी करून मासेमारी करणाऱ्या एक हजार २७१ परराष्ट्रीय जहाजांवर, तर वन्यजीव कायद्याअंतर्गत ३०० बोटिंसह एक हजार ११ जणांवर कार्यवाही करण्यात आली. मागील वर्षभरात तटरक्षक दलाच्या पाच जहाजांना एकूण १३ देशांमध्ये तैनात केले होते. आता देशाच्या साडेसातशे किमी लांबीच्या समुद्र किनाऱ्यावर सरासरी प्रत्येक दोन तासांच्या अंतरावर एक असे तटरक्षक दल आहेत,’ अशी माहिती महानिदेशकांनी दिली.
आज एकूण ७१ टक्के कर्मचाऱ्यांसाठी सदनिका उपलब्ध आहेत. हे प्रमाण पुढीलवर्षी ९५ टक्के होईल. २०२०पर्यंत १०० टक्के करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मुंबई, चेन्नई आणि दिल्ली येथे हॉस्टेलची सुविधा निर्माण करण्यात आल्याचे सिंग यांनी सांगितले; तसेच तटरक्षक दलातील जवानांची मुले अभ्यासात व जीवनात अनन्य साधारण यश मिळवत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
त्यानंतर महानिदेशकांनी जवानांसोबत संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले. रत्नागिरीला तटरक्षक दलाचे महत्त्वाचे बेस बनविण्यासाठी अल्पावधीत केलेल्या कार्यासाठी त्यांनी रत्नागिरीचे स्टेशन कमांडर कमांडंट पाटील यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.