पुणे : मानवी बुद्धीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या संपत्तीचे रक्षण करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दर वर्षी २६ एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिन साजरा केला जातो. या निमित्ताने पुण्यात भारती विद्यापीठाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारताला विविध वस्तूंची पेटंट मिळवून देणारे प्रा. अॅड. गणेश हिंगमिरे यांचे या वेळी त्या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
त्या वेळी बोलताना हिंगमिरे म्हणाले, ‘मानवी बुद्धीतून निर्माण झालेल्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी जागतिक बौद्धिक संपदा हक्क संघटनेची स्थापना झाली आणि सन २०००पासून दर वर्षी २६ एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा हक्क दिन साजरा केला जात आहे. पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट, भौगोलिक निर्देशन (जी आय मार्क) इंडस्ट्रियल डिझाइन या माध्यमातून बौध्दिक संपदेचे रक्षण केले जाते. जागतिक पातळीवर या संपत्तीला मान्यता, प्रसिद्धी मिळावी. ही संपत्ती निर्माण करणाऱ्याला त्याचे कष्टाचे फळ मिळावे यासाठी हा दिन साजरा केला जातो.’
‘भारताने बौद्धिक संपदाविषयक अनेक करार स्वीकारले आहेत. जगभरात १९० देश जागतिक बौद्धिक संपदा संघटनेचे सभासद असून, भारतानेही सदस्यत्व स्वीकारले आहे. भारत, चीन हे विकसनशील देश असून, भारतापेक्षा चीनने पेटंट घेण्यामध्ये आघाडी घेतली आहे. पेटंटसाठी चीनने विशेष आर्थिक तरतूदही केली आहे. भारतही आता त्या दिशेने पाऊल टाकत असून, याबद्दल तरुणांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने प्रयत्न करत आहे’, असेही हिंगमिरे यांनी सांगितले.
भारती विद्यापीठातील सहायक प्राध्यापक डॉ. सपना देव म्हणाल्या, ‘भारती विद्यापीठाचा स्थापना दिन आणि बौद्धिक संपदा दिन एकाच दिवशी असतो. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, बौद्धिक संपदा म्हणजे काय, पेटंट, ट्रेडमार्क इत्यादीबाबतची कायदेशीर प्रक्रिया कशी असते, काय नियम आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, याकरता आम्ही व्याख्यान, चर्चासत्र आणि रॅली अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.’
(बौद्धिक संपदा तज्ज्ञ प्रा. गणेश हिंगमिरे यांचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)