पुणे : ‘या वर्षी पावसाच्या कमतरतेमुळे पुणे विभागात पाणी टंचाईचे तीव्र संकट निर्माण झाले आहे. टंचाई निवारण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा,’ अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त डॉ. सेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागातील टंचाई आढावा बैठक तीन मे २०१९ रोजी पार पडली. त्या वेळी डॉ. म्हैसेकर यांनी जिल्हानिहाय टंचाई निवारणार्थ केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते.
या वेळी साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, साताऱ्याचे कैलास शिंदे, कोल्हापूरचे अमन मित्तल, सांगलीचे प्रभारी विक्रांत बगाडे, उपायुक्त (महसूल) प्रताप जाधव, उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या विषयी अधिक माहिती देताना डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘पावसाच्या कमतरतेमुळे या वर्षी पाण्याची मोठी समस्या आहे. या कालावधीत पुणे विभागातील ६७७ गावे व चार हजार २५८ वाड्यावस्त्यांवरील १२ लाख ३८ हजार २५० लोक, तर तीन लाख ७५ हजार ८४४ इतके पशुधन बाधित झाले आहे. ही संख्या खूपच मोठी असून ४३ शासकीय व ७६१ खासगी असे मिळून ८०४ टँकर्सच्या माध्यमातून पुणे विभागात पाणी पुरवठा केला जात आहे. पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक २११ गावे, तर एक ४१० वाड्या-वस्त्या बाधित आहेत. सातारा जिल्ह्यात तीन लाख १८ हजार ६५८ आणि सांगली जिल्ह्यातील ५४ हजार १८६ पशुधन बाधित आहे.’
पुणे विभागात टंचाईचा सामना करण्यासाठी नवीन विंधन विहिरी घेणे, नळपाणी योजनांची विशेष दुरूस्ती करणे, विंधण विहिरींची विशेष दुरूस्ती करणे, नगरपालिका हद्दीतील प्रगतीपथावरील योजना शीघ्रगतीने पूर्ण करणे, तात्पुरत्या पूरक नळपाणी पुरवठा योजना करणे, विहिरी खोल करणे, त्यांच्यातील गाळ काढणे या उपायोजना करण्यात येत आहेत. टंचाईचा सामना करण्यासाठी या कामांना वेग देणे आवश्यक आहे; तसेच कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना आणि त्यांच्या पशुधनाला दिलासा देण्यासाठी विशेष उपायोजना करण्याच्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी या बैठकीत दिल्या.