रत्नागिरी : ‘नवीन पिढी स्वीकारायला तयार आहे; पण त्यांच्यापर्यंत योग्य ते शिक्षण पोहोचत नाही,’ अशी खंत रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका आणि सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख डॉ. निधी पटवर्धन यांना वाटते. म्हणूनच ही परिस्थिती सुधारण्यासाठी खारीचा वाटा म्हणून त्यांनी ‘उघड्यावरचे ग्रंथालय’ (ओपन लायब्ररी) हा उपक्रम झोपडपट्टीतील मुलांसाठी रत्नागिरीत वर्षभरापूर्वी सुरू केला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमांतर्गत डॉ. निधी पटवर्धन यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्या वेळी त्यांनी या उपक्रमाबद्दल माहिती दिली.
त्या म्हणाल्या, ‘मला लहान मुलांमध्ये रमायला आवडते. त्यांना विकसित होताना पाहायला आवडते. रोज सकाळी मी चालायला जाते. त्या वेळी भाट्ये येथील झोपडपट्टीतील मुले खेळताना, इकडे-तिकडे फिरताना दिसायची. त्यांच्याकडे बघून नेहमी वाटायचे, की यांची ऊर्जा सकारात्मक कामी आली, तर किती बरे होईल. याच उद्देशाने तीन मे २०१७पासून हा उपक्रम मी सुरू केला. सुरुवातीला मी मुलांना उपयोगी पडतील अशी घरातील जुनी पुस्तके देण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप यांसारख्या सोशल मीडियावर आवाहन केले. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. खूप पुस्तके जमा झाली. तिथे पुस्तक घेऊन गेल्यानंतर समजले, की उर्दू माध्यमाची मुले जास्त आहेत. मग त्यांच्यासाठी काही उर्दू पुस्तके खरेदी केली; तसेच रविकांत देवगडकर यांनी ‘नॅशनल बुक ट्रस्ट’च्या (एनबीटी) माध्यमातून काही पुस्तके उपलब्ध करून दिली. आता सुमारे ४०० पुस्तके आमच्याकडे आहेत. या मुलांना अनंत भावेंच्या कविता खूप आवडतात. त्यातल्या काही कविता त्यांनी पाठही केल्या आहेत. ही मुले निसर्गाची प्रार्थना म्हणतात. यातली काही कुटुंबे कर्नाटकातून इथे आलेली आहेत. ही कुटुंबे हातावर पोट असलेली असल्याने ती काही काळ इकडे, तर काही काळ कर्नाटकात असतात; पण इथे शिकतात. त्यांना विकसित होताना मी पाहते. त्यांना निबंध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावला. ‘वयम्’च्या व्यक्तिमत्त्व स्पर्धेत भाग घायला लावला. त्यांची कणाकणाने होत असलेली प्रगती पाहून मन सुखावते.’
‘महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलांमधील मराठी भाषेतील वाढती अनास्था पाहून मुंबई विद्यापीठातर्फे कला शाखेच्या प्रथम वर्षाला मराठी भाषेच्या शुद्धलेखनाचे नियम अभ्यासात अंतर्भूत करण्यात आले आहेत. हल्लीची मुले नियम शिकवल्यानंतरही प्रमाण लेखन करत नाहीत. अशुद्ध मराठी लिहितात-बोलतात. म्हणूनच मुलांना शालेय वयापासूनच मातृभाषेबद्दल सजग करायला हवे. त्यांना मराठी माध्यमातूनच शालेय शिक्षण द्यावे, यासाठी मी आग्रही आहे’, असेही त्यांनी सांगितले.
‘मुलांना शालेय वयापासूनच मातृभाषेबद्दल सजग करायला हवे. यासाठी त्यांना मातृभाषेतूनच शिक्षण द्यायला हवे असे माझे मत आहे. इंग्रजी माध्यमात शिकल्याने मुलांना बोलण्यापुरतीच मराठी कळते. घरात बोलण्याची भाषा मराठी आणि शिक्षण इंग्रजीतून यामुळे ही मुले बोलताना भाषेची सरमिसळ करताना दिसतात आणि हे चित्र हल्ली सर्रास बघायला मिळते. अर्थात, काही मुले इंग्रजी माध्यमात शिकत असूनही स्वतःची भाषा विकसित करतात; मात्र तरीही त्यांच्याकडून अनेकदा चुकीचे मराठी बोलले-लिहिले जाते. मुलांना इतर बाबतीत संस्कारित करण्याबरोबरच भाषेच्या बाबतीत समृद्ध करणे हे शिक्षक आणि पालक या दोघांचेही कर्तव्य आहे. आताचे पालक करिअरमध्ये व्यग्र असल्याने मुलांवर भाषेचे संस्कार करण्यासाठी त्यांना वेळ किती मिळत असेल याबद्दल मी साशंकच आहे,’ असेही डॉ. पटवर्धन म्हणाल्या.
संपर्क : डॉ. निधी पटवर्धन - ९४२१४ ३९६६४
(मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झालेले सर्व लेख, कविता आणि व्हिडिओ https://goo.gl/qgDdWU या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)