पुणे : काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्याची संधी पुणेकरांना त्यांच्या शहरात उपलब्ध झाली आहे. शनिवार, ३० मार्च आणि रविवार, ३१ मार्च असे दोन दिवस ‘के टू के कार्निवल’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतची खाद्यसंस्कृती आणि त्याबरोबरच कला, संगीत, नृत्य, परंपरा यांचाही लोकांना अनुभव घेता येणार आहे. ‘स्वामी समर्थ ग्रुप’च्या ‘समर्थाज इव्हेंट्स’द्वारा औंध-बाणेर लिंक रस्त्यावरील धनकुडे लॉन्स येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘पुणे हे आयटी हब, शिक्षणाचे माहेरघर असल्याने देशभरातून लोक येथे नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने येतात. त्यांना त्याच्या प्रांताची चव येथेही चाखता यावी, आपल्या मातीची अनुभूती पुण्यात राहूनही घेता यावी या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी, ३० मार्च रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात त्या त्या भागातील कला, फॅशन, हस्तकला, घरगुती पदार्थ, संगीत, लोकनृत्य अशी सर्वांगाने ओळख करून घेता येणार आहे. यात खाद्य विभागात प्रांतांनुसार पंजाब-हरियाणा-काश्मीर, गुजराथ-राजस्थान, बंगाल-आसाम-ईशान्य भारत प्रदेश, हैद्राबाद-केरळ-दक्षिण भारत, महारष्ट्र असे विभाग करण्यात आले आहेत. याशिवाय खरेदी विभाग, लहान मुलांसाठी खेळण्याचा भाग आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम अशी व्यवस्था करण्यात आली आहे,’ अशी माहिती संस्थेचे संचालक नरेंद्र पवार यांनी दिली.
पवार म्हणाले, ‘सगळ्यांनाच संपूर्ण भारत फिरून तिथली संस्कृती अनुभवणे, पदार्थ चाखणे शक्य होतेच असे नाही. तसेच बरेच परप्रांतीय लोक पुण्यात येऊन स्थिरावले आहेत. त्यांना त्यांच्या प्रदेशाची आठवण येतेच. अशा सगळ्यांसाठी हा महोत्सव आहे. हा आमचा पहिला महोत्सव असून, पुण्यातील विविध ठिकाणी दर महिन्याला आठ कार्निवल भरविण्याची आमची योजना आहे’.