पुणे : ‘अर्थरचनेतील समस्यांवर अभ्यासपूर्ण भाष्य करणाऱ्या अच्युत गोडबोले लिखित
‘अनर्थ’ या पुस्तकानिमित्त मनोविकास प्रकाशनातर्फे एका विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र शनिवार, २९ जून रोजी सायंकाळी सहा वाजता टिळक रस्त्यावरील पद्मजी सभागृहात होईल,’ अशी माहिती ‘मनोविकास’चे संस्थापक अरविंद पाटकर यांनी दिली.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असेल. नुकत्याच प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्यानिमित्त ‘पर्यावरणीय ऱ्हास, विषमता, बेरोजगारी आणि अर्थकारण यातून घडणारा अनर्थ’, या विषयावर चर्चासत्र होणार असून, यात ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर व सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन व अच्युत गोडबोले सहभागी होणार आहेत. दीपा देशमुख या त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
विकासाच्या प्रक्रियेतून समृद्धीतील समानता येण्याऐवजी विषमता आणि निसर्गाचे शोषण यात वाढच झाली आहे. अधिक नफ्याच्या हट्टातून प्रदूषणाचा विळखा घट्ट होतोय. जोडीला भीषण दारिद्र्य, कोंडीत सापडलेली शेती, पर्यावरणाचा ऱ्हास हे प्रश्न गंभीर बनले आहेत. अशी अनर्थकारी स्थिती का निर्माण झाली, ती आज कोणत्या थराला येऊन पोहोचली आहे, यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय, या प्रश्नांचा वेध घेणारे, नवे सामाजिक भान देणारे आणि वाचकांना अस्वस्थ करणारे हे पुस्तक आहे.
चर्चासत्राविषयी :
दिवस : शनिवार, २९ जून २०१९
वेळ : सायंकाळी सहा वाजता
स्थळ : पद्मजी सभागृह, मराठा चेम्बर्स ऑफ कॉमर्स, टिळक रस्ता, पुणे.
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)