मुंबई : तमिळनाडू सरकारने जल्लिकटटू स्पर्धेबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही बैलगाडा शर्यतीवरची बंदी मागे घेण्याची तयारी दर्शवली असून, त्यासाठी राज्य सरकार विधेयक सादर करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील दापोडी ते लोणावळा या पट्ट्यातील शेतकरी बैलगाडा शर्यतीबाबत नेहमीच उत्सुक असतात.
बैलगाड्यांच्या शर्यतीवरची बंदी उठवण्यासाठी पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीने बैलगाड्यांच्या शर्यतीवरची बंदी उठवण्याबाबत सविस्तर अभ्यास करून, आपला अहवाल विधिमंडळाच्या अधिवेशनात सादर करावा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. येत्या चार-पाच दिवसांत समितीची घोषणा होण्याची शक्यता आहे. समितीच्या शिफारशींवर आधारित कायदा करण्याची सरकारची तयारी राहील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.