पुणे : आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त. आजोबा आणि नातवाच्या दोस्तीची गोष्ट सांगणारा ‘पुष्पक विमान’ हा ‘झी स्टुडिओज्’ची प्रस्तुती आणि सुबोध भावे लिखित चित्रपट येत्या तीन ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वैभव चिंचाळकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून, यात सुबोध भावे आणि मोहन जोशी हे कलाकार रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. अभिनेत्री गौरी किरण या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत. राहुल देशपांडेही एका खास भूमिकेत दिसणार आहेत.
या चित्रपटाची पत्रकार परिषद नुकतीच पुण्यात पार पडली. या वेळी चित्रपटातील सर्व कलाकार, ‘झी स्टुडिओज्’चे शारिक पटेल, मंगेश कुलकर्णी, शौनक अभिषेकी आदी उपस्थित होते.
या वेळी सुबोध भावे म्हणाले, ‘चित्रपटाची कथा आहे विष्णुदास वाणी म्हणजेच तात्यांची. तात्या जळगाव मध्ये राहणारे, वयाची ८३ गाठलेले व्यक्तिमत्व. कीर्तन, भजन आणि शेती ह्यात आयुष्य वेचलेल्या तात्यांना तुकाराम महाराजांची वैकुंठ गमनाची कथा नेहमीच भुरळ घालत असे. हेच तात्या आपल्या एकुलत्या एक नातवाच्या म्हणजेच विलासच्या आग्रहाखातर जेव्हा मुंबई गाठतात तेव्हा मुंबईतील घुसमट त्यांना सहन होत नाही. कधी एकदा मुंबई सोडतो असे झालेले असताना, तात्या पहिल्यांदा अगदी जवळून उडणारे विमान पाहुन भारावून जातात. आयुष्यभर कीर्तनातून ‘तुकाराम महाराजांचा पुष्पक प्रवास’ आनंदाने सांगणाऱ्या तात्यांसाठी ही घटना कलाटणी देणारी ठरते. त्यांच्या विश्वात कल्लोळ माजतो. भावनिक गुंतागुंतीच्या छटेला स्पर्शून जाणारी एक गाथा म्हणजेच ‘पुष्पक विमान’ आहे.’
मंजिरी सुबोध भावे, अरुण जोशी, मीनल श्रीपत इंदुलकर, सुनिल फडतरे आणि वर्षा पाटील यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटातील संवाद आणि पटकथा चेतन सैंदाणे यांचे पटकथा व दिग्दर्शन वैभव चिंचाळकर यांचे आहे. चित्रपटाचं संकलन आशिष म्हात्रे यांनी केले आहे. छायालेखक महेश आणे असून, संतोष फुटाणे यांनी कला दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाला संतोष मुळेकर यांचे पार्श्वसंगीत आहे. या चित्रपटात एकूण सहा गाणी आहेत. नरेंद्र भिडे आणि संतोष मुळेकर यांची संगीतबद्ध केली असून, शौनक अभिषेकी, आनंद भाटे, जयतीर्थ मेवुंडी, विनय मांडके आणि नकाश अझीझ यांनी स्वरबद्ध केली आहेत, तर समीर सामंत आणि चेतन सैंदाणे यांनी शब्दबद्ध केली आहेत.