मुंबई : केंद्र सरकारच्या ‘
शाळा सिद्धी’ या उपक्रमांतर्गत राज्यातील केवळ नऊ हजार शाळा ‘अ’ श्रेणीस पात्र ठरल्या असून, पुणे विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अव्वल शाळांना मानांकन देण्याचा हा उपक्रम प्रथमच हाती घेतला आहे.
या उपक्रमात पुणे विभाग पहिल्या स्थानावर असून, कोकण विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ नाशिक, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, मुंबई, लातूर यांचा क्रमांक लागतो. जिल्हानिहाय याचा अभ्यास केला असता पुणे, सोलापूर आणि ठाणे हे तीन जिल्हे या मूल्यमापनात अव्वल ठरले आहेत.
राज्यातील शंभर टक्के शाळा प्रगत करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न होता. या उपक्रमामुळे त्यास चालना मिळणार आहे. यामध्ये प्रत्येक शाळेने काही ठराविक निकषांवर स्वतःचे मूल्यमापन करून ‘अ’ श्रेणीसाठी दावा करणे अपेक्षित होते. परंतु या निकषांनुसार पहिल्या फेरीत प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरांवरील केवळ नऊ हजार ३७० शाळाच ‘अ’ श्रेणीसाठी दावा करू शकल्या आहेत. शाळांनी हे मूल्यमापन सादर केल्यानंतर विद्या प्राधिकरणाने या शाळांची यादी घोषित केली. शिक्षण विभागातर्फे तयार करण्यात आलेला ‘निर्धारक’ गट या ‘अ’ श्रेणीसाठी निवड झालेल्या शाळांची तपासणी करणार आहे.
या प्रक्रियेमध्ये राज्य सरकारच्या तपासणीत ‘अ’ दर्जा सिद्ध करू शकलेल्या शाळांचे प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येतील आणि नंतर मग देशपातळीवर या शाळांचे मूल्यांकन होणे अभिप्रेत आहे.