मानवाच्या कल्याणासाठी प्रत्येकाने ‘स्वतःमधली अ-प्रगल्भता, अहंकार आणि अज्ञान झटकून टाकून आध्यात्मिकतेच्या वाटेवर चालायला सुरुवात केली, की आत्माविष्कार साध्य होईल आणि तोच आपल्याला स्वर्गाची वाट दाखवेल’ असे ठाम प्रतिपादन करणारे ‘आमंत्रण स्वर्गाचे’ हे पुस्तक लेखक विशाल चिप्कर यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाचा हा परिचय...
.....................
वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी लेखक विशाल चिप्कर यांना न्यूझीलंडमधल्या माउंट रुहापेरूजवळच्या मोकळ्या मैदानात आलेल्या एका विलक्षण अनुभवातून परमानंदाची आणि संमिश्र चेतनाभावाची जाणीव झाली. त्यांना वेगळ्या प्रतलात आणि वेगळ्या मितीत कार्यरत असणाऱ्या दोन समांतर विश्वांमधल्या (Parallel Universe) आपल्या अस्तित्वाची अनुभूती मिळाली. चेतनाभावाची पातळी सतत उंचावून स्व-परीक्षणाची आणि त्यातून आत्माविष्काराची प्रक्रिया सुरू झाल्यावर वैश्विक-चेतनभावाशी एकरूप होणे शक्य होते हे त्यांनी जाणले. मृत्यूला न घाबरता त्या भीतीवर विजय मिळवून विश्वास, श्रद्धा, भक्ती, आत्माविष्कार अशा टप्प्यांवरून मार्गक्रमण करीत आपण स्वर्गापर्यंत कसे जावे, याचा मूलमंत्र विशाल चिप्कर यांनी ‘आमंत्रण स्वर्गाचे’ या पुस्तकातून दिला आहे.
प्रत्येक सजीवाला मृत्यू हा अत्यंत नैसर्गिक आणि अटळ आहे, किंबहुना या विश्वातले आपले अस्तित्व टिकविण्याचा तो एकमात्र मार्ग आहे, हे समजून त्याची भीती आणि खंत न बाळगता, आपल्यातल्या ‘स्व’चा शोध घेणे वेळीच चालू करावे आणि त्यासाठी ईश्वरभक्ती आणि अध्यात्माचा मार्ग चोखाळून उच्च शक्तींचा शोध घ्यावा असे चिप्कर यांनी सांगितले आहे.
एखाद्या देशाच्या अज्ञानी, अहंकारी आणि अपरिपक्व नेत्यामुळे करोडो निष्पाप लोक युद्धक्षेत्रात ओढले जातात. देश शक्तिशाली बनवण्यासाठी करोडो रुपयांचा चुराडा केला जातो, मोठ्या प्रमाणावर कत्तली होतात. आजमितीला पृथ्वीचा ७१ टक्के भाग पाणी आणि केवळ २९ टक्के भाग जमीन असा विभागला गेला आहे. समजा पृथ्वीवर हेच प्रमाण उलटे असते आणि ७१ टक्के भूभाग जमिनीने व्यापला असता, तर किती जागतिक युद्धे झाली असती याचा विचार करा, असा खडा सवाल चिप्कर यांनी उपस्थित केला आहे.
‘सध्याच्या युगाला कलियुग का म्हणायचे’ आणि अशा जगात जगताना ‘स्वर्ग प्रवेशासाठी पात्र कसे बनायचे’ हे अगदी सोप्या भाषेत सांगून त्यापुढच्या दहा प्रकरणांमधून चिप्कर यांनी विश्वाची निर्मिती, चेतनाभाव, भौतिक जगावरचे मानसशास्त्रीय परिणाम, पृथ्वीवरचा सामाजिक परिणाम, आपली जबाबदारी, ध्येय, अग्निपरीक्षा आणि स्वर्गात प्रवेश यांविषयी सखोल विवेचन केले आहे.
‘स्व-अज्ञान, अहंकार आणि अप्रगल्भता’ यांचा एकत्रित परिणाम म्हणजेच नरक’ अशी व्याख्या करून या तीन गोष्टींमुळेच जगात आज युद्धं घडत आहेत, याकडे चिप्कर यांनी लक्ष वेधले आहे. हजारो वर्षांपासून लोकांनी पवित्र ग्रंथांचा अभ्यास करून मनाची पातळी गाठण्याऐवजी, स्वतःला स्वनिर्मित परंपरांमध्ये जखडून ठेवायला सुरुवात केली, आपापले ‘इझम’ जपत त्यातूनच वाद निर्माण होत गेले आणि त्याचीच परिणती पुढे युद्धांत होत गेली. त्यातूनच दुसऱ्याचा छळ करणे, मत्सर, ईर्ष्या, तिटकारा, क्रौर्य अशा अनेक नकारात्मक भावना वाढीस लागल्या. माणूस माणसाचा सर्वांत मोठा शत्रू बनला. त्यामुळे या तीन प्रवृत्तींचं उच्चाटन करण्यासाठी सत्य-चेतनाभावाच्या उच्च पातळीवर पोहोचणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी आवश्यक आहे ती भौतिक लाभांच्या पलीकडे जात केलेली साधना.
त्यासाठी ध्यानधारणेची मदत होते. धर्माच्या धारणा पाळून आणि ईश्वरभक्ती करून मन शांत होऊ शकते, हे विशद करताना चिप्कर यांनी ख्रिश्चनत्व, इस्लामत्व, हिंदुत्व, बुद्धत्व, शीखवाद, ज्यूत्व, बहाईत्व, कन्फ्युशीयसत्व, जैनत्व, शिंतोत्व अशा विविध ‘इझम्स’ची सविस्तर माहिती दिली आहे.
स्वर्गात प्रवेश मिळवण्याचा मार्ग सांगताना चिप्कर यांनी ‘पुनर्जन्मापासून सोडवणूक’ हासुद्धा टप्पा विशद केला आहे. स्वर्गात प्रवेश करण्यासाठी स्वतःला तयार करताना अमर्त्यतेचे शाश्वत मापदंड आपण वापरले पाहिजेत, असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या जन्माच्या अलीकडे आणि पलीकडेही मोठे विश्व आहे. परमोच्च अशा त्या शक्तीच्या ठायी स्वतःला अर्पण करणे जरूरीचे आहे.
अशा वेळी आपण निर्मोही होणे महत्त्वाचे. ज्यांच्याशी आपले भावनिक बंध निर्माण झाले आहेत असे आपले सर्व गणगोत इथून पुढे फार तर शंभर वर्षे असतील; पण आपल्या आत्म्याचा खरा मालक ईश्वर आहे. अगणित काळ तो सातत्याने तुमची साथ देत आहे. जीवनातील शाश्वतता शोधून काढायचा प्रयत्न करा.
‘आत्माविष्कारासाठी’ प्रगाढ इच्छाशक्ती आणि ध्यानधारणा महत्त्वाची. आत्माविष्काराच्या प्रक्रियेत पहिली पायरी म्हणजे सत्य-चेतनभाव. प्रार्थना, समर्पण, प्रामाणिकपणा, भक्ती, निष्ठा, विश्वास, श्रद्धा, इच्छाशक्ती आणि कुतूहल या साऱ्या आपल्याला आत्माविष्काराकडे नेणाऱ्या पायऱ्या आहेत. आत्म्याचे अमर्त्यपण लक्षात येणे महत्त्वाचे!
थोडक्यात म्हणजे, ‘चेतनाभावाची पातळी सतत उंचावून स्व-परीक्षणाची आणि त्यातून आत्माविष्काराची प्रक्रिया सुरू करून प्रत्येकाने स्वतःमधली अ-प्रगल्भता, अहंकार आणि अज्ञान झटकून टाकून आध्यात्मिकतेच्या वाटेवर चालायला सुरुवात केली, की आत्माविष्कार साध्य होईल आणि तोच आपल्याला स्वर्गाची वाट दाखवेल,’ असे चिप्कर यांनी या पुस्तकातून मांडले आहे.
संपर्क : विशाल चिप्कर
प्रकाशक : सुपरह्युमन एनपीओ, न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स, २०१७
पृष्ठे : ३२२
मूल्य : ३५० रुपये
वेबसाइट : www.vsuperhumans.com
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा).