डोंबिवली : वर्षावास सांगता समारंभानिमित डोंबिवली शहरात धम्म रॅली, चिवरदान धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. आंबेडकर सम्यक धम्म संघाच्या वतीने आणि आम्रपाली महिला संघ, गांधीनगर, यशोधरा धम्मसंघ चैतन्य सोसायटी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र (निवासी विभाग) या संस्थांच्या सहभागाने डोंबिवली शहरात ही धम्म रॅली मोठ्या उत्साहात काढण्यात आली.
भन्ते राहुल बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मवर्गांचे आयोजन धम्म उपासकांच्या निवासस्थानी करण्यात आले होते. या वर्षावासाची सांगता धम्म रॅली काढून करण्यात आली. या वेळी धम्म उपासक, उपासिका पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भन्ते डॉ. आनंद एन. महाथेरो यांनी उपस्थितांना धम्मदेसना दिली. उपासकांच्या वतीने भिख्खू संघाला चिवरदान करण्यात आले. भन्ते राहुल बोधी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी डॉ. आंबेडकर सम्यक धम्म संघाचे अध्यक्ष रविकिरण मस्के, कार्याध्यक्ष आशिष कांबळे, सचिव श्रीकांत माने, कल्पना चौधरी, यशोधरा धम्म संघाच्या भारती कडलग, कुसुम खंडगळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राचे प्रा. धनंजय पगारे, अध्यक्षा नलिनी गायकवाड, सचिव मनीषा पगारे, खजिनदार अनिल गायकवाड, उपाध्यक्ष सुधीर वाघमारे, राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे सुपर को-ऑर्डिनेटर रवींद्र गुरचळ, को-कोऑर्डिनेटर पवन भिसे, नीलेश कांबळे, राजू रोकडे आदी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ.आंबेडकर सम्यक धम्म संघ संस्थेच्या वतीने काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कविसंमेलनात मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली येथील कवींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा.रविकिरण मस्के होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शुक्राचार्य गायकवाड, प्रा. धनंजय पगारे उपस्थित होते. या कविसंमेलनात ज्येष्ठ कवी, गायक, मास्टर राजरत्न राजगुरू, ज्येष्ठ कवी साजन शिंदे, साहित्यिक जयवंत सोनवणे, साहित्यिक जगदेव भटू, कवी नवनाथ रणखांबे, गजानन गावंडे, विलास बसवंत, वसंत हिरे, श्रीकृष्ण टोंबरे, बाळासाहेब जोधळे, विकास भंडारे, गोविंद मोरे, धनंजय सरोदे, रोहिदास देठे, कवयित्री अश्विनी पाचपुते, कवयित्री वीणा भालेराव आदी कवींनी दर्जेदार प्रबोधनात्मक कविता सादर केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी बी. आर. पंचांगे यांनी केले. सर्व कवींना संस्थेतर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांचे स्वागत सचिव श्रीकांत माने यांनी केले, तर आभार कार्याध्यक्ष आशिष कांबळे यांनी मानले.