पुणे : दिवाळीचा उत्साह आता बाजारपेठेत जाणवू लागला आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी लोकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. ‘धनत्रयोदशीला सोने खरेदीसाठी लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. दिवाळी आणि त्यानंतर येणाऱ्या लग्नसराईच्या काळासाठीही ही चांगली सुरुवात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धनत्रयोदशीला दागिन्यांच्या विक्रीत पाच ते दहा टक्के वाढ झाली. लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीजेच्या निमित्तानेही दागिने खरेदीत आणखी वाढ होईल,’ असे पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘दसऱ्यापासून संपूर्ण महिन्याचा विचार केला, तर दागिने खरेदीचे प्रमाण गेल्या वर्षीच्या आसपास आहे. या उत्सवकाळात दागिने खरेदी अशीच सुरू राहील, अशी आशा आहे. दिवाळीच्या काळात ग्राहक नेकलेस, बांगड्या, साखळ्या अशा दागिन्यांना पसंती देतात. कॉर्पोरेट व उद्योग क्षेत्रात भेटवस्तू म्हणून चांदीचे दागिने व वस्तूंना अधिक पसंती आहे. या वर्षी पुरूषांच्या प्लॅटिनम ज्वेलरी खरेदीकडेदेखील कल वाढल्याचे दिसत आहे, त्यामध्ये ब्रेसलेट व अंगठ्यांचा समावेश आहे.’
‘चीन आणि अमेरिकेतील व्यापारातील तणाव कमी झाल्याने; तसेच ब्रेक्झिटचा निर्णय पुढे गेल्याने सोन्याच्या भावात काही प्रमाणात स्थिरता आली आहे. त्याचाही सकारात्मक परिणाम बाजारपेठेवर झाला असून, ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे,’ असेही गाडगीळ यांनी नमूद केले.