रत्नागिरी : ‘अनेक क्षेत्रांत महिलांना आरक्षण द्या, असे म्हटले जाते; पण गुणांना आरक्षणाची गरज नसते. गुण व कर्तृत्व असेल तर प्रतिकूलतेवर मात करून महिला गौरवास्पद कामगिरी करतात. त्या स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. महत्त्वाच्या पदांवर स्त्रिया विराजमान झाल्यास ममत्व, वात्सल्य, करुणेने त्या लोकांच्या समस्या नक्कीच सोडवू शकतात,’ असे प्रतिपादन साहित्यिक अॅड. विलास कुवळेकर यांनी केले.
कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघ आणि संस्कार भारतीच्या संयुक्त विद्यमाने रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीदिनी ‘गौरव स्त्री पर्वाचा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. अशी गौरवास्पद उदाहरणे या कार्यक्रमात पाहायला मिळाल्याचे अॅड. कुवळेकर म्हणाले.
या कार्यक्रमात डॉ. निशिगंधा पोंक्षे, अनुया बाम, आकांक्षा कदम व धनश्री महाडिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, सुनेत्रा जोशी, डॉ. कल्पना आठल्ये, रश्मी कशेळकर, अॅड. रुची महाजनी, वीणा लेले, उमा दांडेकर, सिद्धी बोंद्रे, संध्या सुर्वे, सीए मुग्धा करंबेळकर, रुचा कुंभारे, मिहिका परांजपे, अर्चना गोखले, मुग्धा गोगटे, रुचा दुर्वे, माधुरी कांबळे, शीला जोशी, अॅड. प्रिया लोवलेकर, कल्याणी शिंदे, रंजिता शिवलकर, संपदा दांडेकर, मेहरून नाकाडे, वैद्य कीर्ती गुर्जर, आशा पंडित यांना सन्मानित करण्यात आले. डॉ. श्रीकृष्ण जोशी, निशा काळे, वैशाली हळबे, सुजाता साळवी, विलास हर्षे, चंद्रकांत हळबे, ‘संस्कार भारती’च्या अध्यक्षा श्रुती दात्ये आदी मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
अॅड. कुवळेकर म्हणाले, ‘तथाकथित सुसंस्कृत, सुशिक्षित लोक ‘पूर्वीच्या काळात महिलांना मान नव्हता,’ असे रुजवायला बघतात; पण पुराणकाळापासून ‘जननी जन्मभूमीश्च ’ या दोघींना अग्रपूजेचा मान. भवानी-कमलेश्वर, लक्ष्मी-नारायण अशी देवांची नावे प्रथम देवी व नंतर देव या क्रमाने घेतली जातात. गुरुकुल चालवणाऱ्या स्त्रियासुद्धा होत्या. गंगेच्या प्रवाहात हजारो दीप प्रज्ज्वलित करून सोडण्यात येतात. अंधारात ते आकाशातील तारकामंडळ वाटते. या महिलांच्या रूपाने हे तारकामंडळ या समाजात आले आहे.’
कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी सांगितले, ‘संघ गेली ९० वर्षे विविध उपक्रम राबवत असून, रत्नागिरीत वसतिगृह चालवले जाते. राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीनिमित्त विशेष सत्कार, शाळांना पुस्तके, वक्तृत्व स्पर्धाही घेतो. पुस्तके भेट योजनेतील पुस्तके दहा हजार रुपयांपर्यंत देण्याचा विचार असून, त्यासाठी देणगीदारांनी मदत करावी.’
‘संस्कार भारती’च्या अध्यक्षा श्रुती दात्ये यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. दीप्ती कानविंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी आभार मानले.