सध्याचे जग गॅजेटचे आहे. कोणतीही गोष्ट हवी असल्यास आपण ती हातातील मोबाइल किंवा संगणकावर इंटरनेटचा वापर करून घरबसल्या मिळवू शकता. सोशल मीडियाच्या आभासी जगात वावरताना प्रत्यक्षातील नाती, हाडामांसाची माणसे यातील संवाद खुरटत चालला आहे. ही अवस्था कुमुदिनी भार्गव यांनी जाणून ‘जरा येऊ का मनात!’ या पुस्तकातून दाखवून त्याची कारणमीमांसा केली आहे व मूल्यांचे महत्त्वही अधोरेखित केले आहे. भोवताली घडणाऱ्या प्रसंगाचा संदर्भ घेऊन लेखिकेने मनातील भाव, विचारांचे मंथन शब्दांमधून व्यक्त केले आहे. मानवी जीवनाचा आधार असलेल्या श्रद्धेचे अंधश्रद्धेत रूपांतर झाले, की लोक काय काय करतात, याची उदाहरणे यात आहेत. दररोज ज्यांच्याशी संबंध येतो, अशा ज्ञात-अज्ञात व्यक्ती, काम-काळ-वेग यांचे संतुलन राखणे, आरोग्याचा मूलमंत्र असलेली स्वच्छतेची सवय अंगी बाणवणे, तारतम्य पाहून वागणे-बोलणे, घरकाम करणाऱ्या मावश्यांशी मैत्रीचे बंध जोडणे, सशक्त मानसिकता आणि महिलांचा उत्कर्ष, महिलांची जबाबदारी आदी विषयांवर लेखिकेने मनोगत व्यक्त केले आहे. तसेच, लव्ह इन रिलेशनशिप, खरी दानत, अन्न हे पूर्णब्रह्म, संवेदनशीलता अशा अनेक गोष्टींवर एकूण ४४ लेख या पुस्तकात आहेत.
पुस्तक : जरा येऊ का मनात!
लेखिका : कुमुदिनी भार्गव
प्रकाशन : निर्मल प्रकाशन
पृष्ठे : १६८
मूल्य : २०० रुपये
(‘जरा येऊ का मनात!’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)