पुणे : ‘स्वत:मध्ये असलेला न्यूनगंड बाजूला ठेवून स्वत:ला सिद्ध करणे हीच खरी गरज आहे. उभ्या महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांनादेखील स्वत:ला सिद्ध करावे लागले होते. त्यामुळे स्वत:ला कधीही कमी न लेखता सातत्याने प्रयत्न करा, तर उद्याचा दिवस नक्कीच तुमचा आहे’, असे प्रतिपादन माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी केले.
ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या चौथ्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. अभिनेता स्वप्नील जोशी व आंतरराष्ट्रीय टेबलटेनिसपटू पूजा सहस्रबुद्धे यांना ‘युवा गौरव’ पुरस्काराने, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना ‘समाजमित्र’ पुरस्काराने तर, भालचंद्र कुलकर्णी यांना ‘ब्राह्मण जागृती’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी अतुलशास्त्री भगरे गुरुजी, संघटनेचे अध्यक्ष अंकित काणे, सचिव योगेश अत्रे, रोहन जोशी, श्रीनिवास कुलकर्णी, दीपक कुलकर्णी, अतुल अवचट आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना अभिनेते स्वप्नील जोशी म्हणाले, ‘आम्ही जरी चित्रपटामध्ये हिरो असलो तरी आमचे माय-बाप रसिक प्रेक्षकच आहेत. आपल्यासारख्या रसिकांमुळेच आज मराठी चित्रपटांना चांगले दिवस दिसत आहेत. ही एका दिवसात घडलेली किमया नसून, आपल्यासारख्या पाठीराख्यांमुळेच हे शक्य झाले आहे.’
या वेळी बोलताना आंतरराष्ट्रीय टेबलटेनिसपटू पूजा सहस्रबुद्धे म्हणाल्या, ‘कला आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहेत. केवळ आपला या क्षेत्रांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी, प्रास्ताविक अंकित काणे यांनी तर आभार प्रदर्शन योगेश अत्रे यांनी केले.