मुंबई : कवयित्री रेश्मा कारखानीस यांच्या लेखणीतून साकारलेल्या कविता, गीत, गझल, पोवाडा, अभंग अशा वैविध्यपुर्ण काव्यप्रकारांचे सादरीकरण स्वतः रेश्मा कारखानीस आणि गायक, संगीतकार केतन पटवर्धन करणार आहेत. ‘मी शुन्य’ असे नाव असलेला हा संगीतमय कार्यक्रम रविवारी (२० ऑगस्ट) रात्री ८.३० वाजता दादरमधील शिवाजी मंदिर येथे होणार आहे.
शून्याचा महाप्रवास कसा असतो? शून्याने शुन्याला गुणले काय आणि भागले काय.. बेरीज केली काय किंवा वजाबाकी केली काय शेवटी उत्तर शून्यच असणार. अशी ही शुन्याची परिभाषा कवितेच्या दुनियेत एक आगळे-वेगळे रूप धारण करते. असे जीवनमूल्य मांडणाऱ्या कवितांच्या माध्यमातून वेध घेणारा हा सुरेल संगीतमय आविष्कार असणार आहे.
प्रियल क्रिएशन्स निर्मित "मी शुन्य" या संगीतमय मैफीलीत, ‘सर्वगुण संपन्न बायको म्हणे असते केवळ अफवा’, ‘कृष्णा पुन्हा एकदा अवतार घे’, ‘जन्मेन पुन्हा मी तुझ्या रक्षणाकरीता’, ‘काय सांगतोस भोलानाथ, पाऊस नाही पडणार का?’ यांसारख्या व्हॉट्स अॅप व फेसबुक यांच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या कवितांमुळे रसिकांच्या मना-मनात पोहोचलेल्या कवयित्री रेश्मा कारखानीस यांच्या प्रत्यक्ष काव्य सादरीकरणाचा अनोखा अविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे.
सदर कार्यक्रमासाठी प्रवेश विनामुल्य आहे. प्रवेशिका शनिवारपासून (१९ ऑगस्ट) शिवाजी मंदिर, दादर येथे उपलब्ध होतील.
अधिक माहितीसाठी संपर्क : दिपक सावंत ९८२०४०४८८८.