नवी दिल्ली : ‘उडान’ या योजनेअंतर्गत देशात तासाभराचा विमान प्रवास केवळ अडीच हजार रुपयांमध्ये करता येणार आहे. सर्वसामान्य भारतीय नागरिकांना विमानप्रवास अनुभवता यावा यासाठी ‘उडे देश का आम नागरिक’ ऊर्फ ‘उडान’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, जळगाव, नांदेड या प्रमुख शहरांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. नांदेड ते मुंबई आणि नांदेड ते हैदराबाद या सेवा जूनपासून सुरू होणार आहेत. इतर शहरांना सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गणपती राजू आणि राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी ‘उडान’ योजनेमध्ये सहभागी झालेल्या आणि पहिल्या बोलीमध्ये निवड झालेल्या पाच विमान कंपन्यांची आणि त्यांच्या १२८ मार्गांची घोषणा केली. या योजनेमध्ये देशातील कमी वापर झालेल्या आणि पडून असलेल्या विमानतळांना जोडण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्ली-सिमला, आग्रा-जयपूर, चेन्नई- म्हैसूर, अहमदाबाद-मुंद्रा अशा प्रमुख मार्गांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. सध्या विमान कंपन्यांचे दर मागणीनुसार कमी-अधिक होत असतात. त्यामुळे ते अनेकदा सामन्यांच्या आवाक्याबाहेर जातात. छोट्या शहरांमधून प्रवासीसंख्या भरत नसल्याने ते विमान कंपन्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. या पार्श्वभूमीवर ‘उडान’ ही योजना आखण्यात आली आहे.
प्रायोगिक तत्त्वावर सध्या २१ महिन्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या काळात मिळणारा प्रतिसाद पाहून ही सेवा त्या त्या शहरात चालू ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाईल. ७० ते ९० आसनी विमानातील साधारण ५० आसने २५०० रुपये प्रति तिकीट या दराने प्रवाशांना देण्यात येतील व उरलेल्या आसनांसाठी प्रवाशांना नेहमीचे दर लागू असतील. म्हणजे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ तत्त्वावर योजनेची अंमलबजावणी होणार आहे.