पुणे : लोकप्रिय पर्यटनस्थळांना भेट देणारे नागरिक आता धार्मिक, आध्यात्मिक विषयांकडेही वळत आहेत. कर्दळीवन, कैलास, नर्मदा, स्वर्गारोहिणी, गिरनार, दत्त परिक्रमा, चारधाम, काशी, अलाहाबाद गंगासागर यासारख्या यात्रा फक्त आध्यात्मिक यात्रा नाहीत. यामध्ये साहस आहे, शारीरिक कष्ट आहेत आणि एक पूर्णतः वेगळया प्रकारची अनुभूती आहे. आधुनिक जगातील बंधुभगिनी देश, विदेशातून या ठिकाणी जाण्यासाठी उत्सुक आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये साहसी आध्यात्मिक परिक्रमांमध्ये सर्व वयोगटातील बंधू भगिनी सहभागी होत आहेत. सहभागींमध्ये उच्चशिक्षित युवक युवतींचे प्रमाण खूप आहे. देश विदेशातील हजारो व्यक्ती या परिक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. विशेषतः महिलांचे प्रमाण खूपच वाढत आहे.
कैलास मानसरोवर यात्रा, कर्दळीवन परिक्रमा, नर्मदा परिक्रमा, श्रीदत्त परिक्रमा, काशी पंचक्रोशी परिक्रमा, स्वर्गारोहिणी यात्रा, द्रोणागिरी परिक्रमा, गिरनार परिक्रमा, पिठापूर – कुरवपूर परिक्रमा, लाहिरी महाशय राणीखेत गुहा परिक्रमा, पंचकैलास – आदि कैलास, किन्नर कैलास,श्रीखंड कैलास, मणि महेश कैलास, पंचकेदार – केदारनाथ, कल्पेश्वर, रुद्रनाथ, तुंगनाथ, मदमहेश्वर या परिक्रमा लोकप्रिय होत चालल्या आहेत.

या सर्वांचा अभ्यास करून ‘कर्दळीवन सेवा संघा’ने २८ जानेवारी २०१८ रोजी पुण्यात ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित केले आहे. साहसी आध्यात्मिक धार्मिक यात्रा, परिक्रमांची माहिती सर्वांना व्हावी, त्यातील अनुभवांची देवाण घेवाण व्हावी, एकमेकांना मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने हे संमेलन योजले आहे. या परिक्रमांनी साहित्य जगतामध्ये कोणते योगदान दिले आहे, तसेच सामाजिक, सांस्कृतिक परिघांवर याचे कसे पडसाद उमटत आहेत, सांस्कृतिक समन्वय आणि एकीकरण कसे साधले जात आहे, युवा पिढी याकडे का आणि कशी आकर्षित होत आहे या विषयांवर परिसंवाद, व्याख्यान, चर्चासत्रे, अनुभवकथन आणि माहितीपट, चित्र प्रदर्शन असे भरगच्च कार्यक्रम या परिक्रमा महोत्सवात होणार आहेत.
देशात प्रथमच अशा प्रकारचे यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन आयोजित केले जात आहे. लेखक, परिक्रमार्थी, यात्रा परिक्रमाचे आयोजक, सामाजिक कार्यकर्ते असे समाजाच्या अनेक स्तरातील मान्यवर यामध्ये सहभागी होणार आहेत. एकाच ठिकाणी यात्रा परिक्रमांची माहिती, परिक्रमार्थींच्या अनुभवांची देवाण घेवाण, परिक्रमांचे लघु चित्रपटांमधून दर्शन आणि त्यातून एक उत्कट अनुभूती असे या संमेलनाचे स्वरूप आहे. अधिकाधिक रसिकांनी या संमेलनामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. क्षितिज पाटुकले यांनी केले आहे.

या संमेलनाचे उद्घाटन डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, गिरीप्रेमी नागरी एव्हरेस्ट मोहिमेचे उमेश झिरपे, मध्यप्रदेशातील निमाड अभ्युदय मंडलेश्वरच्या भारती ठाकूर, पुण्याच्या उषःप्रभा पागे, कोल्हापूरचे श्रीहरेकाका, हैदराबादचे ब्रह्मा रेड्डी आणि पुण्याचे रवींद्र गुर्जर या मान्यवरांची उद्घाटनाला प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या पहिल्या यात्रा परिक्रमा साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये व्याख्याने, परिसंवाद, चर्चा तर आहेतच; पण या संमेलनातून ‘निमाड अभ्युदय’ या भारती ठाकूर यांनी नर्मदा परिक्रमा किनारी स्थापन केलेल्या अत्यंत गरीब मुलांच्या शैक्षणिक आणि निवासी प्रकल्पासाठी, संमेलनामध्ये सहभागी होणाऱ्या रसिकांच्या सहकार्याने ५ लक्ष रूपयांचा सामाजिक निधी अर्पण केला जाणार आहे. साहित्य संमेलनाच्या सामाजिक दायित्वाचा हा अनोखा सी.एस.आर उपक्रम साहित्य क्षेत्रामध्ये कदाचित प्रथमच राबविला जात आहे.
या संमेलनाची सर्व माहिती या
www.kardaliwan.com/sammelan संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच संमेलनासाठी ऑनलाईन किंवा व्हॉटसअपवर नोंदणी करता येईल.
संमेलनाविषयी :
दिनांक : रविवार, २८ जानेवारी २०१८
वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी ७
ठिकाण : गरवारे कॉलेज, कर्वे रोड, पुणे
संपर्क :
कर्दळीवन सेवा संघ, पुणे
६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिज जवळ, डेक्कन, पुणे ४११००४
फोन : (०२०) २५५३०३७१, २५५३४६०१
व्हॉटसअप क्रमांक : ७०५७६ १७०१८
मोबाईल : ९३७११ ०२४३९, ९६५७७ ०९६७८
ईमेल : swami@kardliwan.com