पुणे : मुलांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी आता शाळांमध्ये वॉटर बेल वाजणार आहे. शाळेत खेळण्याच्या किंवा अभ्यासाच्या नादात मुले पाणी प्यायचे विसरतात, त्यामुळे आवश्यकतेपेक्षा कमी पाणी शरीरात जाते. यामुळे अनेक शारीरिक समस्याही निर्माण होतात. ते टाळण्यासाठी आता शाळांमध्ये ठराविक काळानंतर मुलांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी वॉटर बेल वाजविण्यात येणार आहे.
केरळ राज्यात असा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याच धर्तीवर पुणे महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये, तसेच खासगी शाळांमध्येसुद्धा हा उपक्रम राबविण्यात यावा, असा प्रस्ताव नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी महिला व बालकल्याण समितीसमोर मांडला होता. त्याला सर्वसंमतीने मान्यता देण्यात आली. यानुसार आता सर्व शाळांमध्ये वॉटर बेल वाजविली जाणार आहे.
‘शालेय विद्यार्थ्यांप्रमाणेच सर्वांनीच पुरेशा प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. कमी पाणी पिण्याची सवय शालेय विद्यार्थ्यांमध्ये जास्त असल्याने आता या ठरावामुळे ह्या समस्येच्या निराकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. ही खूप समाधानाची बाब आहे,’ अशी भावना नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केली.