ठाणे : ‘झोपडपट्टी विभागतील नागरी समस्या प्राधान्यक्रमाने सोडवा,’ असे आदेश ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे यांनी प्रशासनास दिले. प्रभाग क्र. सातचा पाहणी दौरा करत असताना त्यांनी हे निर्देश दिले.
प्रभाग क्रमांक सातमधील कामांची पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याबाबत स्थानिक नगरसेवकांनी महापौरांना नागरिकांच्या वतीने निवेदन दिले होते, त्यानुसार प्रभागाचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या पाहणी दौऱ्यास शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, स्थानिक नगरसेविका विमल भोईर, राधिका फाटक, तर प्रशासनाच्या वतीने सहाय्यक आयुक्त चारुशिला पंडित, कार्यालयीन अधिक्षक प्रकाश इषी, कार्यकारी अभियंता रामकृष्ण कोल्हे, विलास धुमाळ, स्वच्छता निरीक्षक सौंदाने, कनिष्ठ अभियंता हर्डीकर, किरण भोये, लोकरे, कर्मचारी चोरगे व प्रभागातील कार्यकर्ते विलास मोरे, राजु फाटक, विजय दिवाटे, संतोष मोरे, प्रताप सुर्वे, स्वप्निल शिंदे, शिरीष मंडलिक, अमोल कदम, चेतन पालांडे व विभागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
या पाहणी दौऱ्यामध्ये मिनाक्षी शिंदे यांनी स्थानिक नगरसेवक, महापालिकेचे संबंधित अधिकारी व स्थानिक नागरिकांसमवेत लक्ष्मी-चिरागनगर भागांतील संपूर्ण परिसराचा दौरा करुन, येथील स्थानिक नागरिकांशी चर्चा करुन आवश्यक कामे तातडीने करण्याबाबत प्रशासनास आदेश दिले. यामध्ये चिरागनगर येथील चौकातील आवश्यक कामे करणे, विभागात ठिकठिकाणी पडलेले रॅबिट उचलणे, सार्वजनिक शौचालयांची आवश्यक दुरुस्ती करणे किंवा नव्याने बांधणे, गटाराची दुरुस्ती करणे, चेंबर्स दुरुस्त करणे वा नवीन बसविणे, गटारातून गेलेल्या विद्युत केबल स्थलांतर करणे, आवश्यकतेनुसार शास्त्रोक्त पध्दतीने गतिरोधक टाकणे, रस्त्याचे डांबरीकरण करणे, कल्व्हर्टची कामे करणे, व्होल्टास कंपनीच्या मागील मलबा हटविणे, जलवाहिनी टाकणे, विभागात दिवे/हायमास्ट बसविणे, सांडपाण्याचा निचरा योग्य पध्दतीने होण्यासाठी आवश्यकतेनुसार गटाराचे बांधकाम करणे, एमएसईबीचे ट्रान्सफॉर्मर स्थलांतर करणे आदि कामे करण्याबाबत सूचना केल्या.
यावेळी लक्ष्मी-चिरागनगर येथील आरोग्य केंद्रास भेट देवून येथील कामाचा आढावा देखील यावेळी शिंदे यांनी घेतला व रुग्णांना आवश्यक सेवा-सुविधा आणि औषधोपचार करण्याबाबत सूचना केल्या. याबद्दल समस्त नागरिक, स्थानिक नगरसेवकांनी त्यांचे आभार मानले आहेत.
‘नागरिकांच्या समस्या सोडवणे किंबहुना नागरिकांना आवश्यक सेवा-सुविधा देणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे, ते आपण पूर्ण करणारच परंतु उपलब्ध झालेल्या सेवा-सुविधा व महापालिकेच्या उपक्रमांना नागरिकांनीदेखील सहकार्य केले पाहिजे,’ असे आवाहन महापौर मिनाक्षी शिंदे यांनी यावेळी केले.