...आणि म्हणता म्हणता तो आला... शेतशिवाराला चिंब करणारा, झाडा-फुलांना बहरून टाकणारा, पशु-पक्ष्यांना सुखावणारा, मनामनांना फुलवणारा, चित्तवृत्ती उल्हसित करणारा, अवघ्या चराचरालाच नवं रूपडं देणारा...तो...श्रावण आला... सर्जनाचा अनोखा आविष्कार असलेल्या या महिन्याचं आणि कवितांचं एक वेगळंच नातं आहे. हे लक्षात घेऊन पाऊस, निसर्ग-पर्यावरण, शेती अशा विषयांशी निगडित असलेली एक कविता श्रावण महिन्यात दररोज प्रसिद्ध करण्याचा उपक्रम दोन वर्षे राबवला होता. त्याला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदाही त्या कविता पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. सुरुवात करू या बालकवींच्या ‘श्रावणमास’ कवितेपासून...
............
श्रावण म्हणजे जीवनाच्या आनंदयात्रेतला एक उत्सवच जणू. ज्येष्ठ-आषाढात दमदार कोसळणारा पाऊस श्रावणात थोडा रमत-गमत, उन्हाशी लपंडाव खेळतच बरसतो. जणू काही दोन महिन्यांच्या अविरत परिश्रमांनंतरची थोडी विश्रांतीच! या काळातच सृष्टी बहरते आणि नवे रूप लेवून सजते...या वेळी अवनी धारण करत असते निसर्गदत्त सौंदर्याचा आविष्कार...आणि आकाशही त्याला अपवाद नसतं...कारण ऊन-पावसाच्या खेळातूनच नभात साकारतं सप्तरंगी इंद्रधनू...साहजिकच सारा आसमंतच मोहरून जातो आणि आपल्या जगण्याचं अवकाशही...नवा उत्साह मिळतो आपल्याला...अन् जगण्याची उमेदही...रिफ्रेश करून टाकतो हा माहौल...शहरातल्या गर्दीत कदाचित हे सारंच्या सारं नसेल मिळत अनुभवायला...पण श्रावणाचा ‘फील’ तरी नक्कीच अनुभवता येतो...अशा या उत्सवाच्या नाटकाचा पडदा आज वर जातोय...पुढचे काही दिवस पाहायला मिळेल त्याचं सुंदर नेपथ्य...आणि आपल्या जीवनाच्या नाट्याला मिळेल एक मस्त कलाटणी!
सृजनाचा अनोखा आविष्कार असलेल्या या महिन्याचं आणि कवितांचं एक वेगळंच नातं आहे. हे लक्षात घेऊन पाऊस, निसर्ग-पर्यावरण, शेती अशा विषयांशी निगडित असलेली एक कविता आजपासून दररोज ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध केली जाणार आहे. सुरुवात अर्थातच
बालकवींच्या ‘
श्रावणमास’ कवितेपासून...
श्रावणमास
श्रावणमासीं हर्ष मानसीं, हिरवळ दाटे चोंहिकडे;
क्षणांत येतें सरसर शिरवें, क्षणांत फिरुनी ऊन पडे.
वरतीं बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे,
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपीं कुणी भासे!
झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा! तों उघडे;
तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळें पिवळें ऊन पडे.
उठती वरतीं जलदांवरती अनंत संध्याराग पहा;
सर्व नभावर होय रेखिलें सुंदरतेचे रूप महा.
बलाकमाला उडतां भासे कल्पसुमांची माळचि ते,
उतरुनि येती अवनीवरतीं ग्रहगोलचि कीं एकमतें.
फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरें सावरिती,
सुंदर हरिणी हिरव्या कुरणीं निज बाळांसह बागडती.
खिल्लारें हीं चरती रानीं, गोपहि गाणीं गात फिरे,
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरें.
सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला;
पारिजातही बघतां भामा-रोष मनीचा मावळला!
सुंदर परडी घेऊनी हाती पुरोपकंठी शुद्धमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुलें-पत्री खुडती.
देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयांत
वदनीं त्यांच्या वाचुनि घ्यावें श्रावण महिन्याचें गीत.
- बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)
(बालकवींच्या ‘आनंदी आनंद गडे’ या कवितेबद्दल वाचण्यासाठी इथं क्लिक करा.)