पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी टाटा मोटर्सतर्फे यंदा पुण्यातील इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतच्या ५०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार हजार रूपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना तीन वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती मिळणार आहे.
गुणवत्ता चाचणीच्या आधारे या प्रत्येक उमेदवाराची निवड करण्यात आली. समता शिक्षण संस्था, सेवा सहयोग फाउंडेशन, सुप्रभात महिला मंडळ आणि स्वरूपवर्धिनी या विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहयोगाने हा उपक्रम राबवण्यात आला.
याबाबत अधिक माहिती देताना टाटा मोटर्सच्या ‘सीएसआर’चे प्रमुख विनोद कुलकर्णी म्हणाले, ‘संस्थांचा पाठिंबा व संसाधनांच्या अभावामुळे जवळपास ५० टक्के विद्यार्थ्यांची माध्यमिक शिक्षण पातळीवर गळती होते. आम्ही याच माध्यामिक टप्प्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या ‘विद्याधनम’ उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही आर्थिक पाठिंबा, खास प्रशिक्षण वर्ग याच्या मदतीने विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी सुधारण्यावर भर देतो. आर्थिक वर्ष २०१८-१९मध्ये आम्ही एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला.’
‘दहा वर्षांपूर्वी आम्ही हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमामुळे सरकारी शाळांमधील विद्यार्थी उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणामध्ये मोठी सुधारणा झाली असून, २०१५ मधील ५५ टक्क्यांवरून हे प्रमाण गेल्या वर्षी ८० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. विद्यार्थ्यांचे सरासरी गुण पाच टक्क्यांनी वाढले आहेत, तर ४४ टक्के विद्यार्थ्यांनी दहावीला ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत,’ असेही कुलकर्णी यांनी सांगितले.