रत्नागिरी : स्वातंत्र्ययुद्धानंतर भारतीय स्वातंत्र्य टिकविण्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या आणि प्रसंगी बलिदान करणाऱ्या योद्ध्यांची कहाणी या वर्षीच्या ‘कीर्तनसंध्या’ महोत्सवात उलगडणार आहे. ‘योद्धा भारत’ हा या वेळच्या कीर्तनांचा आख्यानविषय आहे. प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळेबुवा यांच्या कीर्तनांनी आठ जानेवारी ते १२ जानेवारी २०२० या कालावधीत हा महोत्सव रत्नागिरीत पार पडणार आहे.
कीर्तन म्हणजे महाराष्ट्रातील समाजजागृतीची सर्वांत जुनी प्रभावी कला आहे. त्या परंपरेनुसार रत्नागिरीत २०१२पासून दर वर्षी समाजप्रबोधनाचे मोलाचे कार्य कीर्तनसंध्या महोत्सवातून केले जात आहे. युवा पिढीवर चांगले, योग्य धार्मिक संस्कार रुजवणे, प्रत्येकाच्या मनात राष्ट्रभावना जागवणे, इतिहासाचे खरे ज्ञान देणे, समाजाबाबतचा आदरभाव जागवण्याचे ध्येय समोर ठेवून कीर्तनसंध्या उपक्रम राबविला जात आहे. आतापर्यंत धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, सुभाषचंद्र बोस, महाराणी ताराबाई, पेशवाईचा कालखंड, मराठ्यांचा इतिहास, भारताचे स्वातंत्र्यपर्व असे विषय कीर्तनातून मांडण्यात आले आहेत.
स्वातंत्र्य मिळाले, तरी ते टिकविणे महत्त्वाचे असते. त्यासाठी प्रत्यही युद्धे होतच असतात. चीन आणि पाकिस्तानचे आक्रमण, सीमारेषेवर सातत्याने होणाऱ्या कुरबुरी यांमुळे देशात अशांतता पसरू शकते; मात्र अशा वेळी भारतीय स्वातंत्र्य टिकविण्यासाठी प्राणपणाने लढून आणि प्रसंगी बलिदान करून अनेक योद्ध्यांनी स्वातंत्र्य टिकवून ठेवायला मदत केली. भारतीय स्वातंत्र्यापासून कारगिल युद्धापर्यंतचा हाच इतिहास या वेळी ‘कीर्तनसंध्या’ महोत्सवात मांडला जाणार आहे.
रत्नागिरीत आठवडा बाजारानजीकच्या स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात आठ ते १२ जानेवारी या कालावधीत दररोज सायंकाळी सहा ते १० या वेळेत ही कीर्तने होणार आहेत. महोत्सवात आफळेबुवांना हेरंब जोगळेकर (तबला), वरद सोहोनी (ऑर्गन), प्रथमेश तारळकर (पखवाज), राजन किल्लेकर (सिंथेसायझर), उदय गोखले (व्हायोलिन) आणि अभिजित भट (गायन) हे कलाकार साथसंगत करणार आहेत.
कार्यक्रम मोफत असला, तरी अशा भव्य कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज असते. समाजाच्या विविध घटकांकडून ती पुरविली जात आहे. या वर्षीही भरीव आर्थिक मदतीची गरज असून, दात्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आर्थिक मदतीचा एक भाग म्हणून देणगी सन्मानिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्या मानस जनरल स्टोअर्स (माळनाका, रत्नागिरी – ९०११६ ६२२२०), श्री धन्वंतरी आयुर्वेद (मारुती मंदिर ९४२३२ ९२४३७), नितीन नाफड (मारुती मंदिर – ८३०८८ १३१५८), गुरुकृपा रेडिओ हाउस (टिळक आळी- ९८९०८ २७००६), गौरांग आगाशे (साळवी स्टॉप – ९७३०३ १०७९९), सौ. लोवलेकर (जेल रोड – ९८२२० ७१२५०), श्रीकांत सरदेसाई (९४२११ ४२४९८), श्रीराम गोडबोले (पावस ९४२१२ ३८८२४) येथे उपलब्ध आहेत. आठ जानेवारीपासून महोत्सवाच्या ठिकाणीही सन्मानिका उपलब्ध होतील.