पुणे : ‘भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध दोन्ही देशांच्या प्रगतीला पूरक आहेत. व्यवसाय, शिक्षण, आयटी, संशोधन, आरोग्य, बांधकाम अशा विविध क्षेत्रांत गुंतवणूक करण्यासाठी जपानी उद्योजक उत्सुक आहोत. महाराष्ट्रात जपानी कंपन्याची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या कंपन्यांमध्ये नोकऱ्यांबरोबरच विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण (इंटर्नशिप) कार्यक्रम देण्यात येत आहे. यातून येथील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत,’ असे मत मुंबईतील जपानचे कॉन्सुलेट जनरल मिचिओ हराडा यांनी व्यक्त केले.
‘इंडो जपान बिझनेस काउन्सिल’, ‘कॉन्सुल जनरल ऑफ जपान इन मुंबई’ आणि ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय ‘कोन्निचिवा-पुणे २०१९’ या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मिचिओ हराडा बोलत होते. ‘एमसीसीआयए’च्या सुमंत मुळगावकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी जपान एक्सटर्नल ट्रेड ऑर्गनायझेशनचे डायरेक्टर जनरल मुनेनोरी मात्सुनगा, जपान नॅशनल टुरिझमचे कार्यकारी संचालक युसुके यामामोटो, ऑल निप्पोन एअरवेजचे जनरल मॅनेजर योशीयुकी मिझुची, जपान फाउंडेशनचे पश्चिम विभागीय संचालक हिरोको ओझांकी, इंडो-जपान बिझनेस काउन्सिलचे अध्यक्ष श्रीकांत अत्रे, उपाध्यक्ष सिद्धार्थ देशमुख, अभिषेक चौधरी, ‘एमआयटी’चे प्र-कुलगुरू डॉ. रवीकुमार चिटणीस आदी उपस्थित होते. भारतीय आणि जपानी व्यवसाय, शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक संस्था, भारतीय व जपानी कलाकार, जपानी द्विभाषिक तज्ज्ञ या महोत्सवात सहभागी झाले आहेत. या महोत्सवात निरनिराळे संस्कृतिक कार्यक्रम, माहितीपट स्क्रीनिंग, प्रदर्शने, बिझनेस फेअर, चर्चासत्रे यांचे आयोजन करण्यात आले आहे.
मिचिओ हराडा म्हणाले, ‘२०२० मध्ये जपानमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीयांनी जपानला भेट द्यावी. तेथील निनिराळ्या क्षेत्रांची विविधता अनुभवावी. जपानी नागरिकांमधील वक्तशीरपणा, शिस्त, व्यवस्थापन, स्वच्छता या गुणांचे कौतुक होते. भारतीयांचे जपानमध्ये स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. भारतीय उद्योगांनी जपानमध्ये उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा. त्यासाठी लागणारे सहकार्य करण्यास आम्ही तत्पर आहोत.’
युसुके यामामाटो म्हणाले, ‘दोन्ही देशांमध्ये पर्यटन वाढले असून, मागील वर्षी जपानला भेट देणाऱ्या भारतीयांची संख्या दीड लाख होती. जपानी नागरिकही मोठ्या संख्येने भारताला भेट देत आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील दीर्घकालीन आणि मजबूत संबंधांमध्ये वाढ झाली आहे. भारत आणि जपानच्या सलोख्यामुळे पर्यटन व्यवसायात वृद्धी होईल.’
मुनेनोरी मात्सुनागा म्हणाले, ‘पुणे शहरात जपानी शिक्षण तसेच उद्योगाला प्रोत्साहन दिले जाते. येथे येणाऱ्या जपानी नागरिकांना, विद्यार्थ्यांना सुरक्षित वाटते. मनुष्यबळासह विविध सुविधा उपलब्ध असल्याने पुण्यासह महाराष्ट्रभर जपानी कंपन्या व्यवसाय करण्यासाठी उत्सुक आहेत. भारत आणि जपानदरम्यान राजनैतिक, सांस्कृतिक, व्यापारी सबंध मजबूत होत आहेत. यांचा फायदा दोन्ही देशांना होईल.’
स्वागत-प्रास्ताविक करताना श्रीकांत अत्रे म्हणाले, ‘निरनिराळ्या शाखांची पदवी घेऊन विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी जपानी भाषा शिक्षणाच्या माध्यमातून अनेक संधी उपलब्ध आहेत. तरुणांनी जपानी भाषाशिक्षण घेत या संधी मिळवाव्यात. आज पुणे शहरात जपानी भाषेचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांची संख्या २०० च्या घरात आहेत. भारतात २०१८ मध्ये १४४१ जपानी कंपन्याची नोंदणी करण्यात आली आहे. त्यातील ८१० कंपन्या महाराष्ट्रात आहेत.’
उद्घाटनानंतर झालेल्या चार चर्चासत्रांमध्ये ‘स्मार्ट सिटी कडून सुपर स्मार्ट सोसायटीकडे’ ‘भारत आणि जपान यांच्यातील व्यापारास अनुकूल वातावरण’, ‘२०२० ऑलिम्पिक वर्षात जपानचा दौरा’ आणि ‘जपानमधील करिअर आणि शैक्षणिक संधी’ या विषयांवर मान्यवरांनी आपली मते मांडली. त्यामध्ये अभिषेक चौधुरी, सिद्धार्थ देशमुख, तात्सुनोरी ओनिशी, शैलेंद्र गोस्वामी, योशियुकी मिझुउची, झेलम चौबळ, सुधीर पाटील, मुकुंद यत्नाळकर, श्रीकांत अत्रे, हिरोको ओझाकी, मिलिंद पांडे, प्रा.प्रल्हाद कुलकर्णी, रमण प्रीत, डॉ. गीताली टिळक मोने, अॅड. असीम सरोदे, तोमीओ इसोगाई, विजय कुमार गौडा आदी वक्त्यांनी सहभाग घेतला.
या वेळी कौन्सिलचे उपाध्यक्ष सिद्धार्थ देशमुख यांनी ‘कोन्निचिवा-पुणे २०१९’ या उपक्रमाची माहिती दिली. अभिषेक चौधरी यांनी आभार मानले, तर नवनीश कांडाव आणि सायली दौंडकर यांनी सूत्रसंचालन केले.