एफटीआय विद्यार्थी आंदोलन प्रकरण
पडद्यावरील कामगिरी महत्त्वाची नाही
सर्वच नियुक्त्या असतात राजकीय हेतूने प्रेरीत
नवी दिल्ली - पुण्यातील फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन हे समर्थनीय नसल्याचे मत याच संस्थेचे माजी अध्यक्ष आणि विख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी व्यक्त केल्याने या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे.
एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बेनेगल बोलत होते.
भाजपचे नेते आणि अभिनेते गजेंद्र चौहान यांनी अध्यक्षपदाच्या नियुक्तीआधी पडद्यावर काय कर्तृत्त्व दाखवले हे येथे महत्त्वाचे नसून त्यांचा व्यवस्थापन कौशल्याचा अनुभव आपण घेतलेलाच नाही, तर टीका करण्यात काय हशील आहे, असे बेनेगल यांनी विचारले आहे.
चौहान यांच्या नियुक्तीमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला जात आहे. त्याविषयी बेनेगल म्हणाले की, अशा प्रत्येकच नियुक्तीमध्ये राजकीय हेतू असतातच. आपणही काही राजकीय हेतू मनात बाळगूनच काम करत असतो. आधीच्या सर्व सरकारनीही राजकीय हेतूनेच अनेक नियुक्त्या केल्या होत्या. त्यामुळे चौहान यांच्या नियुक्तीला आव्हान देण्यात काहीही अर्थ नाही. प्रत्येकच सरकार त्यांच्या भूमिकेला अनुसरुन नव्या नियुक्त्या करत असते. त्यात वावगे काहीही नाही. असे असताना नको त्या विषयावरुन वादंग का माजवला जात आहे, हे समजत नसल्याचे बेनेगल म्हणाले.
इन्स्टिट्युटच्या अध्यक्षांना भेटून आपले गैरसमज दूर करुन घेणे अथवा आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे विद्यार्थ्यांना शक्य होते. मात्र, त्यांनी ते न करता, थेट बेमुदत बंदचे हत्यार उपसले आणि संचालक प्रशांत पाठराबे यांना घेराव घातला, जे सर्वस्वी चुकीचे आहे.
सन 1980 ते 1983 आणि सन 1989 ते 1992 असे दोनवेळा बेनेगल या संस्थेचे अध्यक्ष होते. आपल्यालाही विद्यार्थ्यांनी घेराव घालून रात्रभर कोंडले होते. मात्र, त्यावेळी आपण पोलिसांना न बोलावता चर्चेद्वारे प्रश्न सोडवल्याची आठवणही बेनेगल यांनी सांगितली.
गजेंद्र चौहान यांना काम करण्याची संधी दिली पाहिजे. त्यांचे निर्णय जर खरेच संस्थेच्या हिताचे राहणार नसतील तर त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे चुकीचे आहे. कोणत्याही समस्येवर चर्चा हा एक लोकशाही मार्ग असतो. मात्र, आंदोलक विद्यार्थी कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. शिवाय राजकीय नेतेही विनाकारण य विषयात लक्ष घालत आहेत, असे वाटते.
- शाम बेनेगल, विख्यात दिग्दर्शक